प्रतिनिधी /बेळगाव
राज्यात 4,244 नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यासाठी महिला व बाल कल्याण खात्याने प्रस्ताव दिला आहे. यापैकी बेळगाव जिल्ह्यात 325 नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू होणार आहेत. मात्र, अद्याप मंजुरी मिळाली नाही. पण राज्य सरकार नवीन अंगणवाड्या सुरू करण्यासाठी पुढे आले आहे.
ग्रामीण भागातील चिमुकल्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी, यासाठी महिला व बालकल्याण खात्यामार्फत अंगणवाड्या चालविल्या जातात. मात्र, काही ठिकाणी अंगणवाड्यांची संख्या कमी असल्याने बाल विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. सर्वसमावेशक बालविकास योजनेंतर्गत 400 ते 800 लोकसंख्येमागे एक अंगणवाडी केंद्र आवश्यक आहे. मात्र, काही ठिकाणी 2000 लोकसंख्येमागे अंगणवाडी केंद्र नाही. त्यामुळे चिमुकल्यांची शिक्षणाविना परवड होत आहे.
शैक्षणिक वर्षात नवीन अंगणवाड्या सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. त्यानुसार जिल्ह्यात लवकरच सरकारी आणि भाडोत्री इमारतींमध्ये अंगणवाड्या सुरू केल्या जाणार आहेत. यासाठी राज्य सरकारने 260 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे अंगणवाडी नसलेल्या भागाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. पहिल्या टप्प्यात काही भागामध्ये अंगणवाड्या सुरू करण्यात येणार आहेत. यापैकी काही शहरी तर काही ग्रामीण भागात अंगणवाड्या सुरू होणार आहेत.
अल्प उत्पन्नधारक आणि दुर्बल घटकांतील मुलांना शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी अंगणवाड्या उभारल्या जाणार आहेत. ज्या ठिकाणी अंगणवाड्यांची कमतरता आहे, त्या ठिकाणी अंगणवाड्या उभारण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे वाडी-वस्ती आणि डोंगर भागातील समाजाला अंगणवाड्या उपलब्ध होणार आहेत.
शासनाकडून अंगणवाडी सक्षमीकरणाची मोहीम अधिक प्रभावीपणे राबविली जात आहे. ज्या ठिकाणी अंगणवाडी केंद्राची सोय नाही, अशा ठिकाणी अंगणवाडी केंद्र उभारले जाणार आहे. त्यामुळे बेरोजगार महिलांना नोकरी उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात 5,331 अंगणवाडी केंद्रे आहेत. त्यामध्ये आता भर पडणार आहे. शिवाय बाल विद्यार्थ्यांच्या पालनपोषण आणि शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
सरकारचा पुढाकार
जिल्ह्यात 325 नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू केली जाणार आहेत. राज्य सरकारने यासाठी पुढाकार घेतला आहे. ज्या ठिकाणी अंगणवाडी केंद्रे नाहीत त्या ठिकाणी अंगणवाडी केंद्रे सुरू केली जाणार आहेत. सरकारी इमारत नसल्यास भाडेतत्त्वावर इमारतीत केंद्रे सुरू होणार आहेत.
ए. एन. बसवराज, सहसंचालक, महिला व बालकल्याण खाते