प्रतिनिधी/ चिपळूण
कोकण आणि पश्चिम घाटमाथ्याला जोडणाऱया कुंभार्ली घाटात खड्डय़ांमुळे रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. सव्वातीन कि. मी. रस्त्याच्या दुरूस्तीस कार्यारंभ आदेश देऊनही काम सुरू न केलेल्या ठेकेदार ओम कन्ट्रक्शनला 7 महिन्यांत तब्बल 4 नोटीसा बांधकाम विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे आता शेवटची नोटीस देऊन 5 डिसेंबरपर्यत काम सुरू न केल्यास निविदा रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कुंभार्ली घाटात पोलीस चौकीच्या मागे 3.20 कि. मीच्या अंतरात रस्त्याची दुरवस्था झाली आहे. कोकण आणि घाटमाथा जोडणारा हा घाट असल्याने त्यावर वाहनांचीही मोठी वर्दळ असते. खड्डय़ांमुळे येथे वारंवार लहान-मोठे अपघात घडत असतात. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरूस्ती होण्यासाठी सात महिन्यांपूर्वीच या रस्त्याच्या विशेष दुरूस्तीसाठी 1 कोटी 80 लाखाची निविदा प्रसिध्द करण्यात आली. मात्र त्यानंतर कोरोना लॉकडाऊन सुरू झाले. कामाची गरज लक्षात घेऊन बांधकाम विभागाने यासाठी जिल्हाधिकाऱयांकडून विशेष परवानगी घेत ठेकेदार कंपनी ओम कन्ट्रक्शनला कार्यारंभ आदेश दिले.
कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही काम वेळेत सुरू न केल्याने या रस्त्याची अवस्था आणखी खराब होत चालली आहे. या रखडलेल्या कामाबाबत लोकप्रतिनिधींचा दबाव असतानाही ठेकेदार कंपनीवर त्याचा कोणताच परिणाम झाला नाही. कार्यारंभ आदेश 16 एप्रिल रोजी दिला गेला. मात्र कामाला सुरूवात न झाल्याने 11 मे रोजी पहिली, त्यानंतर 16 ऑगस्टला दुसरी, 5 नोव्हेंबरला तिसरी, तर 15 नोव्हेंबरला चौथी नोटीस ठेकेदार कंपनीला देण्यात आली आहे. त्यामध्ये 5 डिसेंबरपर्यत कामाला सुरूवात न केल्यास दंडात्मक कारवाई आणि निविदा रद्दचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात येईल. शिवाय नादुरूस्त रस्ता आणि खड्डय़ांमुळे अपघात वा दुर्दैवी घटना घडल्यास होणाऱया परिणामास ठेकेदार कंपनी जबाबदार राहील, अशी समज देण्यात आली आहे.
राजकीय पक्षांची अनास्था
कुंभार्ली घाटात रस्त्यांतील खड्डय़ांमुळे प्रवास धोकादायक बनला आहे. वारंवार या रस्त्यातील खड्डय़ांची चर्चा होत असते. सात महिन्यांपूर्वी या घाटरस्त्याच्या दुरूस्तीची निविदा निघूनही ठेकेदार काम करत नाही. विशेष म्हणजे महामार्गावरील खड्डय़ांवर बरेचजण गळा काढतात. राजकीय पक्ष आंदोलने करतात. मात्र कुंभार्ली घाटातील दुरवस्थेवर आणि ठेकेदाराच्या दुर्लक्षावर कुणीही चकार शब्द काढताना दिसत नाही.