गेल्या सहा लोकअदालतींना मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद : 86 हजार 877 खटल्यांचा निकाल
गंगाधर पाटील /बेळगाव
राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून प्रलंबित खटले निकालात काढण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. तीन महिन्यांतून एकदा दुसऱ्या शनिवारी लोकअदालत भरविली जाते. त्यामध्ये अनेक खटले निकालात काढले जातात. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्याचा मोठा फायदा होत आहे. गेल्या सहा लोकअदालतीमध्ये 86 हजार 877 खटले निकालात काढण्यात आले असून तब्बल 4 अब्ज 15 कोटी 70 लाख 89 हजार 466 रुपयांची देव-घेव झाली आहे. संपूर्ण देशात ही लोकअदालत भरविली जाते. त्याचप्रकारे बेळगाव जिल्ह्यातही त्या दिवशी जिल्हा कायदा सेवा प्राधिकारच्या माध्यमातून लोकअदालत भरविली जाते.
उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या आदेशानुसार ही लोकअदालत भरविली जात आहे. या लोकअदालतीमध्ये बँक वसुली, कर्ज भरणे, चेकबॉन्स, सोसायटी कर्ज, विमा नुकसानभरपाई यासह कौटुंबिक, फौजदारी खटले निकालात काढले जातात. अलिकडे दिवाणी खटलेही निकालात काढण्यात येत आहेत. त्यामुळे या लोकअदालतींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण जिल्ह्यांमधील न्यायालयांमध्ये ही लोकअदालत भरविली जात आहे. त्यामुळे त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रत्येक न्यायालयामध्ये शेकडो खटले निकालात काढले जात आहेत. त्यामुळे निकालांची आकडेवारी ही दिवसेंदिवस वाढत आहे. याचबरोबर लोकअदालतीमध्ये देव-घेव बाबतचे संपूर्ण खटलेदेखील निकालात काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. कर्जवसुलीसह इतर देव-घेवचे खटले अनेक न्यायालयांमध्ये प्रलंबित राहत आहेत. ते खटले निकालात काढण्यासाठी अधिक लक्ष दिले जात आहे. त्यामुळे प्रत्येक लोकअदालतींमध्ये मोठ्या रकमेची देव-घेव पूर्ण होत आहे.
गेल्या सहा लोकअदालतींमध्ये 2 लाख 4 हजार 452 खटले निकालात काढण्यासाठी घेण्यात आले होते. त्यामधील 86 हजार 877 खटले निकालात काढले गेले आहेत. मोठ्या प्रमाणात खटल्यांचा निकाल लागला गेला आहे. त्यामुळे न्यायालयांवरील ताण कमी झाला आहे. लहान, सहान खटले निकालात काढून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न या लोकअदालतींमधून करण्यात आला आहे. या लोकअदालतींमध्ये कौटुंबिक न्यायालयातील खटले निकालात काढण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू झाले आहेत. विशेष करून पती, पत्नींमधील गैरसमज दूर करून त्यांचा नव्याने संसार जोडण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.
पक्षकारांचाही वेळ व पैसा बचत
न्यायालयातील प्रलंबित खटले निकालात काढण्यासाठी लोकअदालतीची स्थापना करण्यात आली. यामध्ये पक्षकार व त्यांच्या वकिलांना समोर बसवूनच हे खटले निकालात काढले जातात. वादी, प्रतिवादीचे म्हणणे ऐकून घेवून त्यानंतर निकाल दिला जात आहे. त्यामुळे पक्षकारांचाही वेळ व पैसा वाचत आहे. याला दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गेल्या सहा लोकअदालतींमध्ये मोठ्या प्रमाणात खटले निकालात काढले गेले आहेत.