ऑलिम्पिक चळवळीच्या मोहिमेत भारताचे लक्षवेधी यश, पुढील वर्षी आयोजन, 146 देशांचे प्रतिनिधी बैठकीत सहभागी होणार
मुंबई / वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयवोसी) पुढील वर्षी होणाऱया ऑलिम्पिक समितीच्या बैठकीचे यजमानपद मुंबईला बहाल केले असून या समितीमधील भारताच्या प्रतिनिधी नीता अंबानी यांनी देशाच्या ऑलिम्पिक चळवळीतील हे लक्षवेधी यश असल्याचे म्हटले आहे. भारताने ऑलिम्पिक समितीच्या बैठकीचे यजमानपद भूषवण्याची ही 1983 नंतरची पहिलीच वेळ असणार आहे. सदर बैठक स्टेट-ऑफ-द-आर्ट या बँड न्यू जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित केली जाईल.
सदर बैठकीच्या यजमानपदासाठी बीजिंगमधील सेशनदरम्यान मतदान घेण्यात आले. त्यात मुंबईला 99 टक्के मते मिळाली. 75 सदस्यांनी मुंबईला पसंती दिली. चीनमधील बीजिंग शहरात 139 व्या आयवोसी सेशनचे आयोजन केले गेले. त्यात मुंबईच्या यजमानपदावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या वार्षिक बैठकीला आयवोसी सेशन असे संबोधले जाते. या सत्रात 101 मतदान प्रतिनिधी व 45 मानद सदस्यांचा समावेश असतो.
बीजिंगमधील बैठकीत मुंबईच्या यजमानपद प्रस्तावाचे सादरीकरण करणाऱया भारतीय पथकात नीता अंबानी यांच्यासह भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बात्रा, युवक कल्याण, क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांचा समावेश राहिला.
पुढील वर्षी मुंबईत होणाऱया बैठकीत जागतिक ऑलिम्पिक चळवळीवर चर्चा होईल. शिवाय, ऑलिम्पिक चार्टरबाबत निर्णय, आयवोसी सदस्य, पदाधिकाऱयांसाठी निवडणूक व ऑलिम्पिक यजमानपदासाठी निवडणूक आयोजनाचा समावेश असणार आहे.
कोट्स
40 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ऑलिम्पिक चळवळ पुन्हा एकदा भारतात परतत आहे. ही ऐतिहासिक संधी प्रदान केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची मी मनापासून आभारी आहे. भारताच्या ऑलिम्पिक चळवळीतील हा ऐतिहासिक टप्पा असेल. या बैठकीच्या निमित्ताने भारतीय क्रीडा वर्तुळात नव्या पर्वाची सुरुवात होईल.
-आयवोसीमधील भारतीय सदस्या नीता अंबानी