दारिद्र्या निर्मुलनात भारताची मोठी कामगिरी : संयुक्त राष्ट्रसंघाकडून कौतुक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संयुक्त राष्ट्रसंघाने मंगळवारी जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या भारताच्या दारिद्र्या निर्मुलनाच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले आहे. 2005-06 पासून 2019-21 पर्यंत केवळ 15 वर्षांमध्ये भारतात एकूण 41.5 कोटी लोक दारिद्र्यातून बाहेर पडले असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे. जागतिक बहुआयामी दारिद्र्या निर्देशांक (एमपीआय)ची नवी आकडेवारी संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (युएनडीपी) आणि ऑक्सफोर्ड गरीबी आणि मानव विकास पुढाकारने (ओपीएचआय) जारी केली आहे.
भारतासह 25 देशांनी 15 वर्षांमध्ये एमपीआयला यशस्वीपणे निम्म्यावर आणले आहे. यातून जलदगतीने विकास शक्य असल्याचे स्पष्ट होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. वेगाने गरीबी दूर करणाऱ्या देशांमध्ये कंबोडिया, चीन, कांगो, होंडुरास, भारत, इंडोनेशिया, मोरक्को, सर्बिया आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात भारत हा 142.86 कोटी लोकांसोबत चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश ठरला आहे. विशेषकरून भारतात गरीबी दूर करण्यास मोठे यश आले आहे. केवळ 15 वर्षांमध्ये 41.5 कोटी लोक गरीबीतून बाहेर पडले आहेत असे अहवालात म्हटले गेले आहे.
भारतात गरीबांच्या संख्येत 2005-06 मधील 55.1 टक्क्यांवरून घट होत 2019-21 मध्ये केवळ 16.4 टक्के झाली आहे. 2005-06 मध्ये भारतात सुमारे 64.5 कोटी लोक बहुआयामी गरीबीत जगत होते. 2015-16 ही संख्या कमी होत सुमारे 37 कोटी तर 2019-21 मध्ये 23 कोटी झाली असल्याचे अहवालात नमूद आहे. भारतात सर्व निकषांनुसार गरीबीत घट झाली आहे. देशातील सर्वात गरीब समुहांमध्ये मुले आणि वंचित समुदायाचे लोक सामील आहेत. या समुहांमध्ये सर्वाधिक वेगाने विकास घडत असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.
भारतात पोषण संकेतांकाच्या अंतर्गत बहुआयामी स्वरुपात गरीब आणि वंचित लोकांचे प्रमाण 2005-06 मधील 44.3 टक्क्यांवरून कमी होत 2019-21 मध्ये 11.8 टक्के झाले आहे. तर बालमृत्यू दर 4.5 टक्क्यांवरून कमी होत 1.5 टक्के झाला आहे. तर स्वयंपाकासाठीच्या इंधनापासून वंचित असलेल्या लोकांचे प्रमाण 52.9 टक्क्यांवरून कमी होत 13.9 टक्के राहिले आहे. तर स्वच्छतेच्या मूलभूत साधनांपासून वंचित लोकांचे प्रमाण 50.4 टक्क्यांवरून कमी होत केवळ 11.3 टक्के राहिले आहे.
पेयजल संकेतांकांमध्ये यादरम्यान बहुआयामी स्वरुपात गरीब आणि वंचित लोकांचे प्रमाण 16.4 टक्क्यांवरून कमी होत 2.7 टक्के झाले आहे. विजेपासून वंचित लोकांची संख्या 29 टक्क्यांवरून 2.1 टक्क्यांवर आली आहे. तर घरापासून वंचित लोकांचे प्रमाण 44.9 टक्क्यांवरून कमी होत 13.6 टक्के झाले आहे.