प्रतिनिधी/ पणजी
रामनवमीच्या शुभदिनी गोव्यातील लोकांना शुभसंदेश मिळाला असून कोरोना संशयितांचे पुणे येथे पाठविलेले 48 नमुने नकारात्मक आले आहेत. त्याचबरोबर गोव्यात चाचणी केलेले 7 नमुनेही नकारात्मक आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. मात्र निजामुद्दीन दिल्ली येथून आलेल्या 46 तबलिगीमुळे पुन्हा एकदा गोवा अडचणीत आला आहे. या सर्वांचे विलगीकरण करण्यात आले असून त्यांच्या चाचणीचा अहवाल अजून यायचा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
गोव्यातील सर्व संशयित रुग्णांचे अहवाल नकारात्मक आल्याने दिलासा मिळाला होता. मात्र या 46 तबलगीनी पुन्हा संकट निर्माण केले. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व बिगर गोमंतकीय आहेत व सर्वजण मशिदीमध्ये राहिले होते. या सर्वांना पोलिसांनी मशिदीतून काढून विलगीकरणामध्ये ठेवले आहे. या सर्वांची माहिती उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहे. हे कोणत्या कारणास्तव गोव्यात आले होते याचीही चौकशी केली जाणार आहे.
46 पैकी सर्वाधिक तबलगी हे फातोर्डा येथे 16जण सापडले, वास्कोत 13 सापडले, फोंडा येथे 9 जण सापडले, जुने गोवेत 4 व डिचोलीत 4 जण सापडले. या सर्वांनी गोव्याला पुन्हा संकटात टाकले आहे. त्यांचे अहवाल आल्यानंतरच गोवा सुरक्षित आहे की नाही हे ठरणार आहे. अजूनही कुणी राहिले असल्यास पोलीस चौकशी करीत आहेत.
मुस्लिमबांधवांनी सहकार्य करावे
मशिदीमध्ये किंवा अन्य कुणी राहिले असेल तर मुस्लिमबांधवांनी पोलिसांना सहकार्य करावे व माहिती द्यावी. देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. हा कोणत्याही धर्माचा प्रश्न नाही. यामुळे सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. एका मशिदीत एक मौलाना 9 दिवस होता. पण त्याची माहिती दिली गेली नाही. अजूनही, मौलाना कुठे राहिल्यास त्याची माहिती द्यावी. नपेक्षा लोकांना त्याचा त्रास होणार आहे.
लोकांनी चिकन खाऊ नये
बर्ड फ्लू असल्यामुळे लोकांनी चिकन खाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. चोरटय़ापद्धतीने गोव्यात चिकन आणले जाते. मात्र लोकांनी चिकन खाण्याच्या फंदात पडू नये. भाजीपाला मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. 256 ट्रक भरून भाजी आली आहे. आमदार, पंच, सरपंच सारेजण सध्या चांगले काम करीत आहेत. काही टिव्ही चॅनेल नाहक बदनामी करीत आहे. त्यांनी बदनामी करणे टाळावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
ग्रामीण भागात सर्वेक्षण करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. मात्र गोव्यात प्रमाण कमी असल्याने गोव्याची चर्चा झाली नाही. पण पंतप्रधानांचा संदेश मिळाला आहे. यापुढेही काळजी घेण्याच्यादृष्टीने ग्रामीण भागात सर्वेक्षण केले जाणार आहे. एखाद्या व्यक्तीला ताप आला असेल किंवा कोरोनासदृश लक्षणे दिसत असतील तर पाहणी करण्यात येणार आहे. गावोगावी जाऊन डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचारी सर्वेक्षण करणार आहे. गोव्यात पूर्णवेळ कोवीड इस्पितळ, पॅथोलॅब आहे. डॉक्टरांना आणखी माहिती उपलब्ध करून दिली जाणार व कोरोनाविरोधातील लढय़ासाठी सज्ज ठेवणार आहे.
लॉकडाऊन कालावधी वाढण्याची शक्यता
14 एप्रिलला लॉकडाऊनचा कालावधी संपुष्टात येत आहे. मात्र हा कालावधी सुरक्षेच्यादृष्टीने वाढविण्याची शक्यता आहे. सीमा भाग बंद रहाणे गरजेचे आहे. सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन केंद्र सरकार कालावधी वाढविण्याबाबत निर्णय घेणार आहे. जनतेच्या सुरक्षेच्यादृष्टीने सर्व धर्मगुरुंनी लोकांना सांगण्याची गरज आहे. काही धर्माच्या लोकांना धर्मगुरुंचा आदेश पटतो. त्यामुळे मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू धर्मगुरुंनी लोकांना एकत्रित प्रार्थना करण्याबाबत सल्ला द्यावा. बिगर सरकारी संघटनानीही याबाबत जागृती करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
आर्थिक आढाव्यासाठी समिती
राज्याचा आर्थिक आढावा घेण्यासाठी समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती सरकारला सूचना करणार आहे. अर्थव्यवस्था कशी राखावी यासाठी त्यांच्याकडून सूचना घेण्यात येणार आहे.
खलाशाबाबतच्या मुद्यावर पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठविले होते. केंद्र सरकारने सर्वच देशांतील दूतावासाकडे संपर्क साधला आहे. या लोकांना कशाप्रकारे आणता येईल याबाबत केंद्र सरकारही विचार करीत आहे.
शालेय परीक्षांबाबत निर्णय घेणार
राज्याच्या शिक्षण खात्याने परीक्षांबाबत केलेल्या सूचनेसंदर्भात सरकार विचार करीत आहे. त्याबाबतची फाईल आपल्याकडे आली आहे. आपण त्यावर विचार करून निर्णय घेणार. इयत्ता नववी, व इयत्ता दहावीच्या परीक्षाबाबत सध्या गोंधळ निर्माण झाला आहे.
योगासने, व्यायाम करावा
आयुर्वेदिक उपाययोजनावर भर देण्याची गरज आहे. त्यासाठी आयुर्वेदातील दिनचर्या, ऋतुचर्या, यावर भर देण्याची गरज आहे. कोणते पदार्थ सेवन करावे व आरोग्य चांगले राखावे यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. आपण स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर असल्याने हा सल्ला देत आहे. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनीही याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. लोकांनी योगासने करावी व योग्य असा आहार घ्यावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.