ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात लवकरच 5G तंत्रज्ञान कार्यान्वित होणार आहे. त्याचा पर्यावरणावर तसेच लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे अभिनेत्री जूही चावला अनेक दिवसांपासून 5G मोबाईल टॉवर्समधून होणाऱ्या हानिकारक किरणोत्सर्गाविरुद्ध लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करत होती. तिने या 5G तंत्रज्ञानाविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली असून, त्यावर आज पहिली सुनावणी झाली. 2 जूनला यावर पुढील सुनावणी होणार आहे.
जुही चावलाने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, भारतात 5G तंत्रज्ञानाची अंमलबजावणी होण्यापूर्वी सर्वसामान्य लोकांचे आरोग्य, पशु, पक्षी आणि पर्यावरण या बाबींवर या तंत्रज्ञानाचे काय परिणाम होतील, याचा बारकाईने अभ्यास करावा. त्यानंतरच भारतात या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीचा विचार करावा.
आम्ही प्रगत तंत्रज्ञानाच्या विरोधात नाही. आम्हाला चांगले तंत्रज्ञान देणारी नवीन उत्पादने वापरण्यात आनंद आहे. मात्र, 5G टॉवरसमधील किरणोत्सर्ग लोकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी अत्यंत हानिकारक आहे, असेही तिने याचिकेत म्हटले आहे.