मराठा आरक्षणासाठी रणरागिणी उतरल्या रस्त्यावर, मिरजकर तिकटी येथे धरणे आंदोलन
प्रतिनिधी / कोल्हापूर :
मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून या लढ्यात आता मराठा रणरागिणीही उतरल्या आहे. एकच लक्ष मराठ आरक्षण, आरक्षण घेतल्याशिवाय आता थांबयचं नाही. असा नारा देत मिरजकर तिकटी येथील ऐतिहासिक हुतात्मा स्थंभाच्या साक्षिने कोल्हापुरातील महिलांनी मराठा आरक्षण लढ्याचे रणशिंग फुंकले. तासभर धरणे आंदोलन करुन आरक्षणावर गांभिर्याने आणि तातडीने विचार करा असा इशारा सरकारला दिला.
आंदोलनात मराठा आरक्षणावर महिलांनी आक्रमक भूमिका मांडल्या. भाजप कोल्हापूर ग्रामीण महिला आघाडीच्या जिल्हाअध्यक्षा शौमिक महाडिक, कोल्हापूर शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा गायत्री राऊत, जिल्हा बँकेच्या संचालिका उदयानी साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन झाले.
बड्यांचा नको, गरिब मराठ्यांचा विचार करा : शौमिका महाडिक
स्वातंत्र्यापासून मराठा समाजावर अन्याय होत आहे. मुठभर सदन मराठ्यांमुळे गरीब, दबलेल्या मराठा समाजावर अन्याय होत आहे. अजून किती दिवस हा अन्याय सहन करायचा असा सवाल उपस्थित करत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा, गोकुळच्या संचालिका शौमिक महाडिक यांनी बड्यांचा नको, गरीब मराठा समाजाचा विचार करा असे आवाहन केले. त्या म्हणाल्या; मला किंवा आमच्या कुटुंबाला आरक्षणाची गरज आही. समाजातील 70 टक्के मराठा पिचलेला आहे. त्यांना आरक्षणाची गरज आहे. याचा गांभिर्याने विचार करा. त्यांच्यासाठी हा लढा सुरु आहे. त्यांना न्याय मिळवून दिल्यानंतरच हा लढा थांबेल असा इशारा त्यांनी दिला.
हक्काचं मागतोय कुणा हिरावून घेत नाही : गायत्री राऊत
आम्ही कुणाच्या वाट्याचं काढून आम्हाला द्या अशी आमची मागणी नाही आमच्या हक्काचं आरक्षण मिळाले पाहिजे ही मागणी घेऊन लढा सुरुच राहील असा इशारा भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा गायत्री राऊत यांनी दिला. त्या म्हणाल्या; आरक्षणा शिवाय आमच्या पुढच्या पिढ्या मुख्य प्रवाहात येणार नाहीत. गुणवत्ता असून आरक्षण नसल्याने स्पर्धेतून विद्यार्थी बाहेर फेकले जात आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी आमचा लढा आहे. न्यायालयचा निर्णय विरोधात गेला असला तरी राज्य सरकारच्या हातात बऱ्याच गोष्टी आहेत. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही. तो पर्यंत अन्य पर्यायांचा विचार झाला पाहिजे.आण्णासाहेब पाटील महामंडळ सक्षम करा, सारथीला भरीव तरतुद करा, उच्च तंत्र, वैद्यकीय शिक्षणाची संपूर्ण फी राज्य सरकारने भरावी आदी मागण्या त्यांनी केली.
लक्षवेधी फलक
आंदोलनावेळी महिलांनी हातात लक्षवेधी फलक होते. मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाने अधिवेशन तात्काळ बोललेच पाहिजे. मराठ्यांच्या स्वाभिमानाला डिवचणाऱ्या नतदृष्ठ्या समाजकंटकांचा धिक्कार असो, सर्व आजी माजी आमदार खासदारांनी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेच पाहिजे, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशी स्लोगन लिहलेल्या फलकांनी लक्षवेधले होते.
मिरजकर तिकटीत घुमला मराठ्यांचा आवाज
मिरजकर तिकटीला स्वातंत्र्यापूर्व इतिहास आहे. येथून सुरु झालेल्या आंदोलनाची ठिणगी राज्यभर पसरते हा येथील इतिहास आहे. अनेक आंदोलनाचा हा चौक साक्षिदार आहे. या चौकाच्या साक्षिने महिलांनी मराठा आरक्षणाच्या लढ्याचे रणशिंग फुंकले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली गगनभेदी घोषणांनी मिरजकर तिकटवर फक्त आणि फक्त मराठ्यांचा आवाज कानावर येत होता.
आंदोलनात निकिता राऊत पूजा शिंदे, सुजाता पाटील, कविता लाड, अशोक भंडारे, मायदेवी भंडारे, निकिता माने यांच्यासह श्रीनिवास साळोखे, महेश जाधव, जयकुमार शिंदे, बाबा पार्टे, सहभागी झाले होते.