शुभेंदु अधिकारी यांचा दावा
वृत्तसंस्था/ कोलकाता
श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यामुळे पश्चिम बंगालच्या हिंदूंना हा बंगाल मिळाला. श्यामाप्रसाद नसते तर बंगालच्या लोकांना इस्लामिक देशात रहावे लागले असते. त्या देशात अन्य धर्मांना मानणाऱया लोकांना कुठलाच अधिकार मिळत नसल्याचे उद्गार पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते तसेच नंदीग्रामचे भाजप आमदार शुभेंदु अधिकारी यांनी काढले आहेत. एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना अधिकारी यांनी राज्यातील तृणमूल काँग्रेसचे सरकार 6 महिन्याच्या आत कोसळणार असल्याचे उद्गार काढले आहेत.
कोलकाता येथील हाजरा तसेच कालीघाट भागात तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांची छायाचित्रे असलेले पोस्टर्स लावण्यात आली आहेत. यात 6 महिन्यांमध्ये नवी आणि सुधारणा झालेली तृणमूल काँग्रेस अस्तित्वात येणार असल्याचा दावा या पोस्टर्सवर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अधिकारी यांनी केलेल्या टिप्पणीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
शिक्षक भरती घोटाळय़ापासून पशू आणि कोळसा तस्करीप्रकरणी ईडी आणि सीबीआय तपास करत आहे. तृणमूल काँग्रेसचे सरकार 6 महिनेही टिकणार नाही. डिसेंबर महिन्यापर्यंत हे सरकार टिकणार नसल्याचे शुभेंदु यांनी म्हटले आहे.