पिंपरी / प्रतिनिधी :
अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांमधून धर्माच्या नावाने झालेल्या छळ वा अत्याचारामुळे पळून जाऊन भारताच्या आश्रयाला आलेल्या गैरमुस्लिम विस्थापितांना अर्थात हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी आणि जैन बांधवांना भारताचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग ‘का’ कायद्यामुळे मोकळा होणार आहे. स्वातंत्र्यापासून आणि त्यानंतरही भारतात आश्रिताचे जगणे जगण्याचा त्यांच्या माथ्यावरील कलंक मिटणार आहे. या कायद्यामुळे देशात एकही घुसखोर शिल्लक राहणार नसल्याचा दावा भाजपचे नेते विनोद तावडे यांनी येथे व्यक्त केला.
पिंपरीतील बी. टी. आडवाणी धर्मशाळा हॉलमध्ये सीएए कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. खासदार अमर साबळे, भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे आदी उपस्थित होते.
तावडे म्हणाले, नागरिकत्व मिळाल्याने इतर नागरिकांना लागू असलेल्या कायद्यांचा अंमल त्यांच्यासाठी सुकर होणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नोकरी, शिक्षणासंदर्भातील आरक्षण, शिष्यवृत्ती अथवा सरकारी योजनांचे लाभ त्यांच्या पदरात पडतील. परंतु, या सर्व गोष्टींविषयी समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहे. सर्वांनी एक होवून अशा प्रवृत्तींवर मात करूयात.