सॅनिटायझरसाठी स्पिरीट मागवून दारू बनवल्याचा संशय
पाटणा / वृत्तसंस्था
दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये विषारी दारूने पुन्हा एकदा कहर केला आहे. सिवान जिह्यात गेल्या 24 तासात बनावट दारू सेवनाने 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गोपालगंजमध्येही एकाचा मृत्यू झाल्याने एकंदर आठ जणांचा बळी गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेत अन्य 14 हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक असून 6 जणांची दृष्टी गेल्याचा दावाही केला जात आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्मयता वर्तवली जात आहे.
राज्यात पुन्हा विषारी दारूची घटना घडल्याने तपास यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. प्राथमिक तपासाअंती सॅनिटायझर बनवण्यासाठी कोलकाता येथून स्पिरीट मागवण्यात आले होते. त्याचाच वापर करून दारू बनवल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी 16 जणांना अटक करण्यात आली असल्याचे एडीजी जितेंद्र सिंह गंगवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जिह्यातील लकडी नवीगंज ओपी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाला आणि भोपतपूर गावात बनावट दारूची सर्वाधिक प्रकरणे घडली आहेत. रविवारी सायंकाळी अचानक एकामागून एक रुग्ण रुग्णालयात येऊ लागले. सायंकाळी उशिरा रुग्णालयात पोहोचत असताना एकाचा मृत्यू झाला. रात्री आणखी दोघांचा मृत्यू झाला. सोमवारी दिवसभरात आणखी 5 जणांना जीव गमवावा लागला. एकंदर 8 जणांचा मृत्यू झाल्याची सरकारी आकडेवारी असली तरी हा आकडा अधिक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
बनावट दारू प्यायल्याने 14 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सिवानमध्ये दोघा जणांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित 12 जणांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. गोरखपूर आणि पाटणा येथे उपचारासाठी काहींना दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर सिवान सदर हॉस्पिटल आणि बाला आणि भोटपूर गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रशासनाची सावध भूमिका
स्थानिक लोकांनी विषारी दारू सेवनानेच हे बळी गेल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप काहीही सांगण्यास नकार दिला आहे. कुटुंबाला मीडियाशी बोलण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाढत्या मृत्यूंमुळे संपूर्ण गावात गोंधळाचे वातावरण आहे. बनावट दारू सेवनाबाबत आताच काही सांगता येणार नाही. पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतरच सविस्तर कारण स्पष्ट होईल. मात्र, इतक्या लोकांच्या प्रकृती बिघाडामागील कारणे शोधणे हा तपासाचा विषय असल्याचे सिवानचे जिल्हाधिकारी अमित कुमार पांडे यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात 70 हून अधिक मृत्यू
गेल्या महिन्यात 14 ते 18 डिसेंबरदरम्यान छाप्रा जिह्यातील मशरख आणि इसुआपूर भागात 70 हून अधिक लोकांचा बनावट दारू सेवनामुळे मृत्यू झाला होता. रुग्णालयात पोहोचण्यास उशीर हेदेखील मृत्यूचे कारण होते. मात्र, सरकारने बनावट दारूमुळे केवळ 42 जणांचा मृत्यू झाल्याचे मान्य केले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची दखल घेत बनावट दारूमुळे झालेल्या मृत्यूची चौकशी सुरू आहे.