नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, रविवारी ‘ मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधत कोरोना लसींचे दोन्ही डोस घेणं गरजेचं असल्याचे सांगितलं. त्याचसोबत त्यांनी टोकियो ऑलिंपिकसाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देखील दिल्या. तसेच त्यांनी साताऱ्यातील प्रवीण जाधव या खेळाडूचे ऑलिंपिक निवडीबद्दल कौतुक केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जर तुम्ही आमच्या प्रवीण जाधव बद्दल ऐकले तर तुम्हाला पण वाटेल की किती कठीण संघर्षानंतर प्रवीण इथे पोहोचले आहेत. प्रवीण जाधव हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका गावात राहतात. ते तिरंदाजीतील उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांचे आईवडील मजुरी करून कुटुंब चालवतात आणि आता त्यांचा मुलगा, आपल्या पहिल्या ऑलिंपिकसाठी टोकियोला जात आहे. ही फक्त त्यांच्या आईवडिलांसाठीच नव्हे, तर आपल्या सर्वांसाठीही अभिमानाची गोष्ट आहे.
टोकियोला जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा संघर्ष आहे. या खेळाडूंना भारताचा गौरव वाढवायचा आहे. म्हणूनच मी देशवासियांना सांगू इच्छितो, की या खेळाडूंवर आपण दबाव न आणता त्यांना खुल्या मनाने पाठिंबा द्या, असे देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यासोबतच त्यांनी मिल्का सिंग यांचं स्मरण केलं. तसेच कोरोना लसीबाबत कोणताही गैरसमज बाळगू नये, प्रत्येकाने लवकरात लवकर लस घेऊन लसीकरणाच्या मोहिमेत योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.