वृत्तसंस्था/ कोलंबो
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेत मालिका खेळणार आहे. उभय संघातील या मालिकेला 13 जुलैपासून प्रारंभ होणार आहे. लंकेत दाखल झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने आपल्या सरावाला शुक्रवारी प्रथमच प्रारंभ केला.
भारतीय क्रिकेट संघाचे गेल्या सोमवारी लंकेत आगमन झाल्यानंतर या संघातील खेळाडूंना तीन दिवसांच्या कालावधीसाठी एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. लंकेच्या दौऱयावर आलेल्या भारतीय संघाला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख तसेच माजी कर्णधार राहुल द्रविडचे मार्गदर्शन लाभत आहे. लंकन दौऱयासाठी निवडण्यात आलेल्या भारताच्या या दुय्यम संघामध्ये चेतन साकारिया, के. गौतम, नितीश राणा, देवदत्त पडिक्कल, वरुण चक्रवर्ती आणि ऋतुराज गायकवाड या सहा नव्या खेळाडूंचा समावेश आहे. पृथ्वी शॉ, इशान किशन, संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांच्या कामगिरीकडे निवड समितीचे लक्ष राहिल. भारत आणि लंका यांच्यात तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळविले जाणार आहेत.
भारतीय संघ-शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंडय़ा, नितीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, यजुवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंडय़ा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकारिया.