अन्न-नागरी पुरवठा खात्याची कारवाई, बोगस रेशनकार्डे रद्द
प्रतिनिधी/ बेळगाव
आर्थिकदृष्टय़ा सक्षम असून देखील खोटी माहिती पुरवून अंत्योदय, बीपीएल रेशनकार्डे घेतलेल्या कार्डधारकांना सरकारने दणका दिला आहे. राज्यातील 91,189 अनधिकृत रेशनकार्डे रद्द करण्यात आली आहेत. अन्न व नागरी पुरवठा खात्याने ही कारवाई केली आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवरील भार कमी झाला आहे.
आर्थिकदृष्टय़ा सबळ असतानाही अनेकांनी खोटी माहिती देऊन बीपीएल रेशनकार्डे मिळविली आहेत. यामध्ये सरकारी कर्मचाऱयांसह खासगी कंपन्यांमध्ये मोठा पगार असणाऱयांचाही समावेश आहे. यापूर्वी अनेकवेळा खात्याकडून आर्थिकदृष्टय़ा सक्षम असणाऱयांना स्वःताहून बीपीएलकार्डे परत करावीत, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र याकडे दुर्लक्ष करून अनेकांनी रेशनचा लाभ घेणे सुरूच ठेवले होते. त्यामुळे खात्याने बोगस रेशनकार्डे रद्द करण्याचे काम हाती घेतले आहे.
शिवाय निधन झालेल्या रेशनकार्डधारकांचा तपास घेण्यात येत आहे. त्यांच्या नावाने धान्य घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा पुरवठादेखील स्थगित करण्यात येत आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजाराहून अधिक असलेल्या, आयकर भरणाऱया व शहरात 1 हजार चौरस फुटापेक्षा अधिक जागेत घर असणाऱया, शिक्षण, परिवहन, हेस्कॉम, रेल्वे, पोलीस आदी खात्यातील सरकारी कर्मचाऱयांनी खोटी माहिती पुरवून बीपीएल रेशनकार्डे मिळविली आहेत. शिवाय काहींनी नावे वगळून कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावाने बीपीएल कार्डे मिळविली आहेत. अशांची रेशनकार्डे रद्द करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.
गोरगरीब जनतेला जीवनाश्यक साहित्य रेशनद्वारे सहज उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाकडून रेशनचा पुरवठा केला जातो. मात्र गरीब जनतेबरोबर आर्थिकदृष्टय़ा धनाढय़ असलेल्या काही कुटुंबीयांनी खोटी माहिती पुरवून बीपीएल रेशनकार्डे मिळविली आहेत. अशांची बीपीएल रेशनकार्डे रद्द करण्याची मोहीम अन्न व नागरी पुरवठा खात्याने गतिमान केली आहे.