प्रतिनिधी / सातारा :
साताऱ्यातील शनिवार पेठेत राहणाऱ्या एका महिलेने सांडपाण्यावरुन विचारणा केल्याचा राग मनात ठेवत महिलेसह तिच्या जावेस मारहाण केल्याप्रकरणी शनिवार पेठेतील पाच जणावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप या प्रकरणी कोणास अटक झालेली नव्हती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार महिला शहनाज सिंकदर सय्यद (वय 48, रा. 303, शनिवार पेठ, सातारा) या दि. 6 रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास घरात असताना त्यांच्या घरासमोर सांडपाणी वाहत होते. हे सांडपाणी त्यांच्या घराच्या पाठीमागे राहणाऱ्या नईम पालकर यांच्या घरापाठीमागे कट्ट्यावरील वीट काढल्याने वाहत होते.
सय्यद यांनी नईम पालकर यांना विचारणा केली असता त्यांनी त्यांचा भाऊ व भाचे यांना फोन करुन बोलावून घेतले. यावेळी नईम पालकर, शाहरुख पालकर, असराद पालकर, अब्राहम पालकर, मुक्तार पालकर (सर्व रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी शिवीगाळ दमदाटी केली. शाहरुख पालकर याने वीट फेकून मारली तसेच भांडणे सोडवण्यास आलेल्या सय्यद यांचे पती, दोन्ही मुले तसेच जाऊ जरिना सय्यद यांना देखील मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे.