ओटवणे प्रतिनिधी-
कोरोना महामारीचा दीड वर्ष सर्वजण अनुभव घेत आहेत. अद्यापही कोरोना संकट कायम असून या कोरोना प्रतिबंधासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीनेही गेले सव्वा वर्ष कोरोना प्रतिबंधात्मक उपक्रम सुरू असून या प्रतिष्ठानच्यावतीने नुकतेच सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुक्यातील महत्त्वाचा ६० ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक जनजागृती फलक लावण्यात आलेले आहेत.
सिंधुमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रवीणकुमार ठाकरे आणि सिंधुमित्रांच्या संकल्पनेतून हे फलक कोरोना प्रतिबंधासाठी गावोगावी लावण्यात आलेले आहेत. यात जनतेला मास्क, सॅनिटायझर वापर करून शारीरिक अंतर याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कुठलेही लक्षण आढळले तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने कोरोना चाचणी करून घ्या. त्यामुळे कुटुंबासह समाज सुरक्षित राहील. तसेच शासनाच्या निर्देशानुसार लसीकरण करून घ्या हे आवाहन करण्यात आले आहे.