स्वच्छतेच्या नावाखाली शहरवासियांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप : मनपा अधिकाऱयांनी चौकशी करावी
प्रतिनिधी /बेळगाव
शहर आणि उपनगरांतील कचऱयाची उचल करण्याचे काम कंत्राट पद्धतीने करण्यात येते. याकरिता घरपट्टीच्या माध्यमातून स्वच्छता शुल्क आणि स्वच्छता व्यवस्थापन सेस आकारला जातो. तरीदेखील काही स्वच्छता कामगार नागरिकांकडे पैशांची मागणी करीत असल्याचा प्रकार मंगळवारपेठ, टिळकवाडी परिसरात सुरू आहे. स्वच्छतेच्या नावाखाली शहरवासियांची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
स्वच्छतेच्या नावाखाली विविध उपक्रम राबविले जातात. याकरिता शासनाकडून कोटय़वधीचे अनुदान मंजूर केले जाते. आवश्यकता नसतानादेखील महापालिकेकडून विविध वाहनांच्या आणि यंत्रोपकरणांच्या खरेदीसाठी निधी खर्ची घातला जातो. मात्र स्वच्छता व्यवस्थापन शुल्क आणि स्वच्छता व्यवस्थापन सेस अशा दोन प्रकारे मालमत्ताधारकांकडून घरपट्टीसोबत स्वच्छता कर वसूल करण्याचा सपाटा सुरू आहे. तर दुसरीकडे घरोघरी येवून कचरा घेत असल्याचे सांगून स्वच्छता कामगार नागरिकांकडे पैशांची मागणी करीत आहेत. त्यामुळे मनपाकडून स्वच्छता शुल्क आकारला जात असताना स्वच्छता कामगारांना पैसे का द्यायचे? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
महापालिकेने घरोघरी जावून कचऱयाची उचल करण्याचे कंत्राट दिले आहे. शहर स्वच्छतेसाठी वर्षाला 40 कोटीहून अधिक निधी खर्ची घातला जातो. घरोघरी जावून कचऱयाची उचल करण्यासाठी कामगारांची नियुक्ती करणे तसेच कचरावाहू वाहने आदीकरिता निविदा काढल्या जातात. कंत्राट पद्धतीने दिलेल्या स्वच्छता कामासाठी महापालिकेकडून 40 कोटीचा निधी खर्च केला जात आहे. तरीदेखील घरोघरी जावून कचऱयाची उचल करणारे कामगार नागरिकांकडे पैशांची मागणी करीत असल्याचा प्रकार मंगळवारपेठ, टिळकवाडी येथे निदर्शनास आला.
कचऱयाची उचल करण्यासाठी पैसे द्या, अशी मागणी महिला कामगार व मुकादम करीत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. घरपट्टी भरताना स्वच्छता व्यवस्थापन शुल्कापोटी प्रत्येक मालमत्ताधारकांकडून वर्षाला 360 रुपये आकारण्यात येतात. तसेच स्वच्छता व्यवस्थापन सेसच्या नावाखाली 480 ते 3 हजार रुपयांपर्यंत रक्कम आकारण्यात येत आहे. त्यामुळे 1 हजार चौरस फूट आकाराच्या मालमत्ताधारकांना वर्षाला 850 रुपये स्वच्छता कर भरावा लागत आहे. मनपाच्या माहितीनुसार महापालिका व्याप्तीत 1 लाख 30 हजारांहून अधिक मालमत्ता आहेत. या मालमत्तांकडून प्रत्येकी 360 रुपयेप्रमाणे स्वच्छता शुल्काची आकारणी होते. ही रक्कम 4 कोटी 68 लाख होते. पण इतकी रक्कम भरूनही स्वच्छतेचे काम व्यवस्थित होत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
केवळ घरातीलच कचऱयाची उचल…
केवळ घरातील कचऱयाची उचल केली जाते. रस्त्याशेजारी साचलेला कचरा, झाडांचा पालापाचोळा अशा कचऱयाची उचल करण्यास स्वच्छता कामगार पैशांची मागणी करतात. काहीवेळा दुकान किंवा अपार्टमेंटसमोर कचऱयाची उचल करण्यासाठी पैशांची मागणी करण्यात येत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. मनपाकडे स्वच्छता कराची रक्कम भरूनदेखील कचरा उचल करणारे कामगार पैशांची मागणी करीत आहेत. त्यामुळे याची चौकशी करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.