पाणी जपून वापरण्याचे ग्रामपंचायतीचे आवाहन
वार्ताहर / कबनूर
कबनूर भागात सतत होणाऱ्या मोठ्या पावसामुळे रुई बंधारा नजीक असलेल्या जॅकवेलमध्ये पाणी शिरल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे कबनूर गावाला होणारा पाणीपुरवठाही बंद झाला आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्यातीने करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी पात्रातून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. सततच्या पावसामुळे पंचगंगेने रौद्ररूप धारण केले आहे. रुई धरणावर जलस्वराज्य योजनेतून कबनूर गावाला नळ पाणीपुरवठा योजनेतून पाणी पुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या जॅकवेलमध्येदेखील पाणी शिरले आहे. तसेच पावसामुळे शुक्रवारी सायंकाळी ठिकठिकाणचा वीज पुरवठाही खंडित करण्यात आला आहे. वीज पुरवठा नसल्याने जॅकवेलमधून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. खंडित वीज पुरवठा सुरळीत होईपर्यंत कबनूरमधील नागरिकांनी त्याची दखल घेऊन पाणी जपून वापरावे असे आव्हान ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.