मुंबई \ ऑनलाईन टीम
महाविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये सातत्यानं ओबीसी आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत असतात. अशात मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणावरून भाजपवर निशाणा साधला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं ओबीसी आरक्षण रद्द झालं हे भाजपचंच पाप असल्याचा घणाघात वडेट्टीवार यांनी केला आहे.
महाविकास आघाडी ओबीसी आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी काम करत असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारमधले तीनही पक्ष ओबीसी आरक्षणासाठी काम करत आहेत. राज्य सरकारमार्फत आम्ही ओबीसींचा डेटा मिळवू आणि ओबीसी आरक्षण मिळवून देऊ असा विश्वास वडेट्टीवारांनी व्यक्त केला.
पुरग्रस्तांसाठी राज्य सरकारने 11 हजार 500 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. या पॅकेजवरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली. या टीकेला वडेट्टीवार यांनी उत्तर दिलं आहे. विरोधक त्यांची भूमिका पार पाडत आहेत. पण त्यांनी जाहीर केलेलं पॅकेज आम्हालाही माहिती आहे. आपत्तीग्रस्तांसाठी रस्ते, वीज, या मूलभूत गोष्टींसाठी निधी दिला पाहिजे. त्या सर्वांचा या पॅकेजमध्ये समावेश आहे आणि राज्य सरकारनं एक सर्वसमावेशक पॅकेज जाहीर केलं आहे, सं विजय वडेट्टीवार म्हणाले.