सांगोला, करमाळा, माळशिरस, माढ्याचा समावेश
प्रतिनिधी / सोलापूर
कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने त्याची साखळी तोडण्यासाठी शुक्रवार, 13 ऑगस्टपासून जिल्हयातील पंढरपूर, सांगोला, करमाळा, माळशिरस आणि माढा या पाच तालुक्यात पुन्हा संपूर्ण संचारबंदी लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी रविवारी रात्री काढला आहे.
ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता जिल्हा प्रशासनाने कठोर निर्णय घेतला आहे. तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील वाढती रुग्णसंख्या धोकादायक असल्याने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी सोलापूर दौर्यावर आल्यानंतर निर्णय घेण्याचे सर्वाधिकार जिल्हाधिकार्यांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी शंभरकर यांनी संचारबंदीचा आदेश काढला आहे.जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पंढरपूर, सांगोला, करमाळा, माळशिरस, माढा या तालुक्यांत रुग्णांची संख्या वाढत आहे.
शिवाय शासनाने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी केली जात नसल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. लग्न समारंभ, अंत्यसंस्कार वा सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. वारंवार कारवाई करूनही नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने आता पहिल्या टप्प्यात रुग्णांची संख्या वाढलेल्या तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.ग्रामीणमध्ये सध्या एकूण 4 हजार 639 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये पंढरपूर 1 हजार 118, माळशिरस 843, माढा 748, सांगोला 880 व करमाळा 452 रुग्णांचा समावेश आहे. पाच तालुक्यांत 4 हजार 41 इतकी रुग्णांची संख्या आहे. उर्वरित दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, मोहोळ, बार्शी व मंगळवेढा या सहा तालुक्यांत आहेत. तेथील संख्या कमी आहे.पाच तालुक्यातील संसर्ग इतर तालुक्यांत पसरू नये, यासाठी संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय ज्या गावांमध्ये बाधितांची संख्या अधिक आहे, त्यावर अधिक लक्ष ठेवण्यात येणार आहे.
अत्यावश्यक सेवांना सवलतरुग्णवाढ असलेल्या पाच तालुक्यांत संचारबंदी लागू केली असली तरी यातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. दूध, भाजीपाला, किराणा दुकाने, हॉस्पिटल, पेट्रोलपंप सुरू ठेवण्यास दुपारी चारपर्यंत मुभा देण्यात आली आहे. लग्नसमारंभासाठी 25 तर अंत्यविधीसाठी 20 जणांची मर्यादा घालण्यात आली आहे. खासगी कार्यालये पूर्णत: बंद राहणार आहेत. सरकारी कार्यालयात 50 टक्के उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे. हॉटेल व दारु दुकाने बंद राहणार असून केवळ पार्सल व घरपोच सेवा सुरू राहणार आहे. मेळावे, सभांवर बंदी लादण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक 50 टक्के क्षमतेने सुरू असणार आहे. बाजार समित्या दुपारी दोन वाजेपर्यंत तर कृषी विषयक दुकाने दुपारी चारपर्यंत चालू राहतील.