प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या घटत असल्याने, रविवारी स्वातंत्र्यदिनापासून शहरातील सर्व दुकाने सुरू होत आहेत. रात्री 10 वाजेपर्यंत या सर्व दुकानांचे शटर उघडी राहणार आहेत. गेले काही महिने ठप्प असलेली बाजारपेठ, स्वातंत्र्यदिनापासून ग्राहकासाठी सज्ज झाली आहे. या मुहूर्तावर मोठी आर्थिक उलाढाल होईल अशी अपेक्षा व्यापारी-व्यावसायिकामधून व्यक्त केली जात आहे. स्वातंत्र्यदिनासाठी शहरामध्ये जिलेबी स्टॉल्स उभारले आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एप्रिल महीन्यापासून प्रशासनाने लॉकडाऊन लावले होते. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय पूर्णपणे बंद होते. लॉकडाऊनमुळे शहरातील रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता. कोरोना रूग्णांची संख्या घटू लागल्याने, टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनमध्ये शिथीलता कमी करण्यात आली. सकाळी सात ते सायंकाळी चारपर्यंत ही दुकाने सुरू होती. मात्र इतर सर्व दुकाने बंद असल्याने इतर दुकाने सुरू करावीत अशी व्यावसायिकांची मागणी होती.
काल रविवारपासून (स्वातंत्रदिनी) सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिल्याने व्यापारी, व्यावसायिक व कामगार यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे व्यावसायिकांनी आपल्या दुकानांची स्वच्छता, नवीन माल भरणे, कामगारांची भरती हे काम सुरू आहे. येथून पुढे गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी हे मोठे सण असल्याने, गेले दोन वर्षे ठप्प झालेल्या बाजारपेठेची आर्थिक चपे पुन्हा वेगाने फिरणार असल्याची अपेक्षा आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्याने बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल होणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट सुध्दा रात्री दहापर्यंत सुरू राहणार असल्याने,त्यांची तयारी सुरू झाली आहे. शनिवारी लॉकडाऊन आहे की नाही ? हे झालेल्या गर्दीमुळे स्पष्ट झाले होते. शनिवारी महाव्दार रोडवर फेरीवाल्यांचे स्टॉल सुरू असल्याने खरेदीसाठी लोकांची गर्दी झालेली दिसत होती.