महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे प्रतिपादन
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
सध्याचा इंग्लिश संघ भारताच्या जागतिक दर्जाच्या सीम गोलंदाजीसमोर पूर्ण निष्प्रभ होत राहिला असून केवळ कर्णधार जो रुटकडेच शतक झळकावण्याची क्षमता दिसून येते, असे निरीक्षण भारताचा माजी कर्णधार, महान फलंदाज सचिन तेंडुलकरने नोंदवले. भारताने दुसऱया कसोटी सामन्यात इंग्लंडचा 151 धावांनी धुव्वा उडवला, त्या पार्श्वभूमीवर सचिन बोलत होता. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सचिनने सविस्तर संवाद साधला. त्यातील मुख्य अंश.
प्रश्न : तू अनेक विजयाचा साक्षीदार राहिला आहेस. लॉर्ड्सच्या या विजयाचे वर्णन कसे करशील?
उत्तर : नाणेफेक जिंकल्यानंतर जो रुटने भारताला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले, ते माझ्यासाठी अतिशय आश्चर्याचे होते. इंग्लंडला भारताच्या जलद गोलंदाजांची धास्ती आहे, याचे ते कदाचित संकेत होते. हवामानाची साथ लाभली तर ही कसोटी आपण जिंकू शकतो, असा मेसेज मी शुक्रवारी सकाळी 8 वाजता एका मित्राला पाठवला होता. मोहम्मद सिराजचा एक चेंडू रॉबिन्सनच्या छातीपर्यंत उसळला, त्यावेळी खेळपट्टीचे स्वरुप कसे असेल, हे स्पष्ट झाले. प्रथम गोलंदाजीचा इंग्लंडचा निर्णय रास्त नव्हता आणि आपल्या सलामीवीरांनी अतिशय दर्जेदार कामगिरी साकारली, त्याचा विशेष उल्लेख करावा लागेल.
प्रश्न : इंग्लिश फलंदाजी लाईनअपबद्दल काय वाटते?
उत्तर : सध्याच्या इंग्लिश संघाचे डाव अनेकदा अचानक कोसळले आहेत. या संघात जो रुटचा अपवाद वगळता अन्य एकही फलंदाज मैदानावर उतरुन शतक झळकावण्याच्या योग्यतेचा वाटत नाही. ऍलिस्टर कूक, मायकल वॉन, केविन पीटरसन, इयान बेल, जोनाथन ट्रॉट, ऍन्डय़्रू स्ट्रॉस यांच्यासारखे खेळाडू या संघात नाहीत. सध्याच्या संघातील रुटचा अपवाद वगळता अन्य एखादा खेळाडू केव्हा तरी शतक झळकावेलही. पण, सातत्य राखू शकणार नाही. त्यामुळे, रुटने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला असेल.
प्रश्न : रोहितच्या पहिल्या इनिंगमधील फलंदाजीविषयी काय वाटते? त्याचे हूक-पूलचे फटके त्याला अडचणीत आणणारे भासत होते.
उत्तर : मी ज्याप्रमाणे पाहिले आहे, त्याप्रमाणे रोहित स्वतः पुढाकाराने खेळतो आणि पूर्ण सामन्याचे चित्र बदलून टाकतो. परिस्थिती जशी असेल, त्याप्रमाणे खेळण्यावर त्याचा भर असतो. रोहित उत्तम फलंदाज आहे आणि केएल राहुल त्याला समयोचित साथ देत आला आहे. पूल फटक्यावर त्याने चेंडू सीमापार धाडले आहेत. तो चेंडू उत्तमरित्या सोडून देऊ शकतो. शिवाय, उत्तम बचावात्मक फटके देखील खेळू शकतो. त्यामुळे, चिंतेचे कारण नाही.
प्रश्न : रहाणे व पुजारा यांनी 100 धावांच्या भागीदारीसाठी जवळपास 50 षटके घेतली. त्यांच्यावर असलेले दडपण यातून दिसून येते का?
उत्तर : रहाणे व पुजारा 3 बाद 28 अशी संघाची दैना उडाली असताना क्रीझवर एकत्र होते. आणखी दोन फलंदाज स्वस्तात गारद झाले असते तर संघाची स्थिती 5 बाद 60 अशी होण्यास वेळ लागला नसता. अशा परिस्थितीत या दोघांनी डाव सावरला, ते महत्त्वाचे आहे.
प्रश्न : विराट सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. यामागे तांत्रिक कारण आहे की त्याची मानसिकता?
उत्तर : विराटला चांगली सुरुवात करता आलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. मनात गोंधळ असतो, त्यावेळी तंत्रात चुका होत असतात. जर खराब फॉर्म असेल तर चुकांची पुनरावृत्ती होऊ शकते. एखादा फलंदाज फॉर्ममध्ये नसेल तर फूटवर्क व्यवस्थित होत नाही.
प्रश्न : कपिल, श्रीनाथ किंवा झहीर यांच्या पर्वानंतर आताची भारतीय वेगवान गोलंदाजी लाईनअप कशी वाटते?
उत्तर : सध्याची ही गोलंदाजी लाईनअप जागतिक स्तरावरील सर्वोत्तमपैकी एक आहे. गुणवत्ता, शिस्त, तंदुरुस्तीवर मेहनत घेण्याची क्षमता आणि शिकत राहण्याची उर्मी, याचे हे प्रतिबिंब आहे. मला तुलना करणे आवडत नाही. कारण, गोलंदाजी लाईनअपची पारख त्यांच्याविरुद्ध फलंदाजी करणाऱया फलंदाजांवरुन होत असते. कपिल असेल, श्रीनाथ किंवा झहीर, त्यांना सामोरे जाणारे फलंदाज विभिन्न होते.
प्रश्न : जसप्रित बुमराह आता सर्वोत्तम भासतो आहे. डब्ल्यूटीसी फायनल व आतापर्यंत काय बदलले आहे?
उत्तर : डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी बुमराहला फारसे लाँग स्पेल मिळाले नव्हते. बुमराह जितकी षटके टाकतो, तितका तो बहरत जातो, असे अनेकदा दिसून आले आहे. कल्पकता, हे त्याच्या गोलंदाजीचे मुख्य वैशिष्टय़ आहे. रॉबिन्सनला स्लोअर वनवर बाद केले, त्यावेळी ते आणखी एकदा दिसून आले.
प्रश्न : सिराजच्या छोटय़ाशा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतून काय दिसून येते?
उत्तर : सिराज सर्व बाबी चटकन आत्मसात करतो आणि जलद गोलंदाजासाठी हे खूप महत्त्वाचे असते. मागील वर्षी एमसीजीवरील सिराज आणि आताचा सिराज यामध्ये मोठा फरक आहे. एखाद्या षटकात कशी रणनीती राबवावी, स्पेलमधील टेक्निक कसे असावे, यात त्याने उत्तम मेहनत घेतली असल्याचे जाणवते.