ऑनलाईन टीम / मुंबई :
रायगड जिह्यातील तळीये गावातील सर्व सातही वाडय़ांमधील एकूण 261 घरांची पुनर्बांधणी म्हाडान विहित काल मर्यादेत पूर्ण करावी असे निर्देश गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहेत. तळीये गावाच्या पुनर्वसनासंदर्भात नुकतीच मंत्रालयात गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली व उद्योग राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, तळीये गावातील घरांच्या पुर्नबांधणीसाठी मदत व पुनर्वसन विभागाने म्हाडास जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच तेथे रस्ते, वीज, पाणी, शाळा, अंगणवाडी, समाजमंदिर, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाने म्हाडास आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा. त्यानुसार म्हाडाने लेआऊट तयार करून त्याचा विकास एजन्सी म्हणून करावा. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या मुख्य अधिकाऱयांनी पुढील आठवडय़ात तळीये येथे जाऊन जागेची पाहणी करावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले आहेत.
या बैठकीला म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष मुख्याधिकारी योगेश म्हसे, म्हाडाच्या कोकण मंडळाचे मुख्याधिकारी डॉ. नितीन महाजन, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्याधिकारी अरुण डोंगरे, उपसचिव सुनील तुंबारे उपस्थित होते.
दरम्यान, महाड तालुक्मयाला 22 जुलै रोजी अतिवृष्टीचा तडाखा बसला होता. यावेळी तळिये गावात अख्खा डोंगरच खचून अनेक घरे त्याखाली गाडली गेली होती. त्यात सुमारे 85 ग्रामंस्थांचा मृत्यू झाला होता तर 31 ग्रामस्थांचा शोध न लागल्याने नंतर या ग्रामस्थांनाही मृत घोषित करण्यात आले होते.