प्रतिनिधी /येळ्ळूर
सुळगे (येळ्ळूर) ग्रा. पं. च्यावतीने कचरा निर्मूलन योजना अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आली आहे. बुधवार दि. 18 रोजी ग्राम पंचायत कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली. अगोदर दोन दिवस गावात दवंडी देऊन लोकांना कळविण्यात आले होते. यापुढे प्लास्टिक व इतर कचरा जमा करण्यात आला. नागरिकांनी जमा करून ठेवलेला कचरा सफाई कामगाराकडे दिला. सध्या भाडोत्री ट्रक्टरचा वापर करण्यात आला आहे. कचरा दोन विभागात ठेवण्यास सांगण्यात आला. ओला आणि सुका कचरा असे कचऱयाचे स्वरुप राहणार आहे.
सुळगे (येळ्ळूर) ग्राम पंचायतीत सुळगे, राजहंसगड, यरमाळ अशा तीन गावांचा समावेश आहे. प्रत्येक गावातून आठवडय़ाला दोन वेळा कचरा गोळा करण्यात येणार आहे. गावचा जमा झालेला कचरा सुळगे गावच्या सर्व्हे नं. 40 मध्ये आणून टाकण्यात येणार आहे. कचरा जमा करणे प्रारंभप्रसंगी पीडीओ दुर्गाप्पा तहसीलदार, क्लार्क अमित कुकडोळकर, सचिन पाटील, राजू सुतार, शंकर शिंगे उपस्थित होते.
योजनेचे स्वरुप
महात्मा गांधी राष्ट्रीय योजनेतून कचरा डेपोसाठी राज्य सरकारकडून 20 लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. ग्राम पंचायत क्रिया योजनेतून 10 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यामध्ये कचरा वाहतुकीसाठी 6 लाखाची कचरागाडी खरेदी करण्यात येणार आहे. इन्सुलेटर मशीन 50 हजार रुपये, पीपीई किट 50 हजार रुपये, या योजनेतून कर्मचाऱयांचा पगारही देण्यात येणार आहे. जिल्हा पंचायतकडून 1 लाख 84 हजार रुपये खर्च करून प्रत्येक घरासाठी एक प्लास्टिक बादली देण्यात येणार आहे. प्रत्येक घराला 50 रु. प्रति महिना कर द्यावा लागणार आहे.
गायरानाच्या जमिनीची विभागणी
सुळगे गावाला सर्व्हे नं. 40 मध्ये केवळ 7 एकर 35 गुंठे जमीन आहे. पूर्वापार आजतागायत गोरगरीब, शेतकरी गुरांना चारण्यासाठी जमिनीचा वापर करत आहेत. पण आता पुढील विभागणीप्रमाणे गायरानाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. एकूण क्षेत्र 7 एकर 36 गुंठे, त्यातील 1 एकर 20 गुंठे जमीन तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकाऱयांनी आपल्या अधिकाराखाली घेतली आहे. 5 एकर जमीन आता कचरा डेपोसाठी घेण्यात आली आहे. एकूण उरलेली जमीन 1 एकर 11 गुंठे त्यातही जल निर्मल योजनेतून सुमारे एक एकर तलाव बांधण्यात आला आहे. बाकीच्या भाग कातळ खडकाचा असून तो पोटखराब भाग आहे.
ग्रामीण भागातील कचरा
90 टक्क्याहून अधिक ग्रामीण भागात आहेत. शेतीला पुरक जनावरे आहेत. शेण खताच्या खड्डय़ात शेण, उरलेले गवतसह झाडलोट कचराही टाकून कुजविण्यात येतो. काही घरात अजुनही स्वयंपाकासाठी चुलीचा वापर करतात. लाकूड फाटा वापरला जातो. स्वयंपाकासाठी नसेल तर पाणी गरम करण्यासाठी चुलीचा वापर करतात. त्यात लाकूड, शेणकुट, प्लास्टिकसह सर्व कचरा वापरला जातो. ही राख पुन्हा शेणखताच्या खड्डय़ात टाकून सेंद्रिय खत बनविले जाते.