जिल्हा प्रशासन सतर्क ः नृसिंहवाडी, कुरुंदवाडसह सात गावात मोठा बंदोबस्त
प्रतिनिधी/ कोल्हापूर- इचलकरंजी
पुरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज, रविवारी नृसिंहवाडी येथील कृष्णा-पंचगंगा संगमावर जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नृसिंहवाडी आणि परिसरात येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे नृसिंहवाडी परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप आले आहे. या आंदोलनात कोल्हापूर, सांगलीसह कर्नाटकातील शेतकरी मोठÎा संख्येने सहभागी होणार आहेत. खबरदारी म्हणून शनिवारी पोलीस प्रशासनाने शिरोळ, कुरुंदवाड, नृसिंहवाडी परिसराची पाहणी केली. एकूण 423 पोलीस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.
जुलैमध्ये महापुराने उदध्वस्त झालेल्या शेतकऱयांची 2019 च्या धर्तीवर संपूर्ण कर्जमाफी करावी, यासह विविध मागण्यासाठी राजू शेट्टी यांनी पंचगंगा परिक्रमा जलसमाधी पदयात्रा प्रयाग चिखली (ता. करवीर) ते नृसिंहवाडी (ता. शिरोळ) अशी 1 सप्टेंबरपासून सुरु केली आहे. या पदयात्रेमध्ये शेट्टी यांचे कुटूंबीयही सहभागी झाले आहे. पदयात्रेचा शेवटचा शनिवारचा मुक्काम अब्दुललाट (ता. शिरोळ) गावी असून, तेथून या यात्रेला रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सुरुवात होणार आहे. त्यानंतर हेरवाड, तेरवाड, कुरुंदवाड मार्गे नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील कृष्णा-पंचगंगा संगमाकडे यात्रा रवाना होणार आहे. जलसमाधी पदयात्रेच्या अखेरच्या दिवशी दुपारी शेट्टी, त्यांचे कुटूंबीय, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पूरग्रस्त शेतकऱयांना ताब्यात घेण्याविषयी व्युहरचनेची आखणी केली जात आहे, अशी माहिती सुत्रानी दिली.
जिह्यातील नद्यांना सुमारे दिड महिन्यापूर्वी आलेल्या महापूराचा फटका बसलेल्या पूरग्रस्तांना नुकसानभरपाई मिळावी, यासह अन्य मागण्यासाठी माजी खासदार शेट्टी यांनी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्याच्या समवेत सुरू झालेल्या जलसमाधी पदयात्रेमध्ये कोल्हापूर, सांगली जिह्यासह कर्नाटक राज्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो पुरग्रस्त शेतकरी सहभागी झाले आहे. जलसमाधी घेणारच यावर सर्वजण ठाम आहेत.
जिल्हा प्रशासनाने शिरोळ तालुक्यात विशेषत: कुरुंदवाड, नृसिंहवाडी आणि नदी पलिकडच्या सात गावात जादा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. सर्वांना हेरवाड ते कुरुंदवाड गावादरम्यान रविवारी दुपारी कोणत्याही क्षणी ताब्यात घेण्यात येणार आहे, अशी माहिती सुत्रानी दिली. तर संघटनेचे काही पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पुरग्रस्त शेतकरी गानिमीकावा पध्दतीने पोलिसांना चकवा देवून, नृसिंहवाडी येथील कृष्णा-पंचगंगा संगमावर जलसमाधी घेणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे संगम परिसरात नदीत रेस्क्यु फोर्सची पथके बोटीसह तैनात केली आहेत. संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्याच्या हालचालीवर पोलिसांच्याकडून लक्ष ठेवून माहिती संकलीत केली जात आहे.