दोन -तीन अपवाद वगळता सर्व नवे चेहरे : व्हीव्ही पॅट नसताना मतदान प्रक्रिया राबविली,निवडणूक मॅनेज केल्याचा आरोप
प्रतिनिधी /बेळगाव
जेमतेम पन्नास टक्के मतदानाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका निवडणुकीचे निकाल अनपेक्षित तितकेच धक्कादायक असल्याचे चित्र उघड झाले आहे. केवळ दोन-तीन अपवाद वगळता सर्व नवे चेहरे दिसणार आहेत. भारतीय जनता पक्षाला बहुमत तर दुसऱया क्रमांकावर काँग्रेस पक्षाला संधी मिळाली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला प्रथमच फटका बसला आहे. व्हीव्ही पॅटची उणीव, सदोष वॉर्डपुनर्रचना, मतदारांची नावे गहाळ यामुळे धक्कादायक निकाल लागल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ही निवडणूक मॅनेज करण्यात आली आहे, असा आरोपही करण्यात येत आहे.
महापालिकेच्या 58 वॉर्डांकरिता 385 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. याकरिता शुक्रवार दि. 3 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीचा निकाल सोमवारी लागला. बी. के. मॉडेल शाळेत झालेल्या मतमोजणीवेळी अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल बाहेर पडले. मतमोजणीला सकाळी 8 वाजता प्रारंभ झाला. सर्व उमेदवारांच्या समक्ष स्ट्राँग रूम खुले केल्यानंतर बारा खोल्यांमध्ये मतमोजणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. तर मतमोजणीस प्रारंभ झाल्यानंतर पहिला निकाल 9 वाजता लागला. वॉर्ड क्रमांक 15 मधून भाजपच्या नेत्रावती भागवत विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर वॉर्ड क्रमांक 14 मधील म. ए. समितीचे उमेदवार शिवाजी मंडोळकर विजयी झाल्याने समितीचे खाते उघडले. बेळगाव दक्षिण मतदार संघात वॉर्ड क्रमांक 27 मधून रवि साळुंके हे म. ए. समितीचे उमेदवार विजयी झाले. त्यांच्यासाठी माजी उपमहापौर संजय शिंदे यांनी निवडणुकीतून माघार घेऊन रवि साळुंके यांच्यासाठी मार्ग सोपा केला होता.
महापालिकेत 1984 पासून आतापर्यंत मराठी भाषिकांचे वर्चस्व होते. मात्र महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मराठी भाषिकांना पराभव पत्करावा लागला. ईव्हीएम मशीनचा घोळ आणि मराठी भाषिकांमधील दुफळीमुळे महापालिकेवरील सत्ता गमविण्याची वेळ आली आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांचे अस्तित्व संपविण्यासाठी प्रशासन आणि राष्ट्रीय पक्षांकडून हरप्रकारे प्रयत्न सुरू आहेत. पुनर्रचना आणि आरक्षणाच्या आडून मराठी भाषिकांना सत्तेपासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता. पण महापालिकेवरील सत्तेपासून मराठी भाषिकांना रोखण्यास राष्ट्रीय पक्षांना आजवर यश आले नव्हते. मात्र या निवडणुकीत वॉर्ड पुनर्रचना करून आणि आरक्षणाच्या पडद्याआडून राजकारणाची खेळी खेळण्यात आल्याने मराठी भाषिकांचा पराभव झाला आहे. मराठी भाषिक नगरसेवक निवडून येवू नये, अशा प्रकारची वॉर्ड पुनर्रचना करण्यात आली होती. तसेच ईव्हीएम मशीनच्या सदोष निवडणूक प्रक्रियेमुळे मराठी भाषिकांचे अस्तित्व असलेल्या वॉर्डमध्ये देखील मराठी भाषिक उमेदवारांना पराभव पत्करावा लागला.
महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यात आली. चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय राष्ट्रीय पक्षांनी घोषित केल्यानंतर ईव्हीएम मशीनमध्ये घोळ होण्याची शक्मयता व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे काहींनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवून बॅलेट पेपरद्वारा निवडणूक घेण्याची मागणी केली होती. पण निवडणूक जाहीर झाल्याने याबाबत कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. तसेच वॉर्ड पुनर्रचनेबाबतही न्यायालयीन वाद सुरू असताना राज्य निवडणूक आयोगाने घिसाडघाईने निवडणुकीची घोषणा केली होती. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पण यामध्ये यश आले नाही. तसेच निम्म्याहून अधिक मतदारांची नावे मतदारयादीमधून गहाळ असल्याचे मतदानावेळी निदर्शनास आले होते. तसेच वॉर्ड पुनर्रचना व्यवस्थित झाली नसल्याने या निवडणूक प्रक्रियेचा फटका मराठी भाषिक उमेदवारांना बसला आहे. त्यामुळेच निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांना यश आले आहे.
मतमोजणी वेळी एका पाठोपाठ एक अशा विजयी उमेदवारांची घोषणा झाली. यामध्ये वॉर्ड क्रमांक 1 मधून अपक्ष उमदेवार अकिरा मुल्ला आणि वॉर्ड क्रमांक 2 मधून काँग्रेसचे मुजम्मिल डोणी, वॉर्ड क्रमांक 3 मधून ज्योती कडोलकर आदींच्या विजयांची घोषणा करण्यात आली. प्रत्येक खोलीमध्ये दोन टेबलवर मतमोजणी सुरू होती. त्यामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व मतमोजणी पूर्ण झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे 35 उमेदवार निवडून आल्याने महापालिकेवर बहुमत मिळाले आहे. महापालिकेत त्रिशंकू राजवट येईल, असे भाकित काहींनी व्यक्त केले होते. मात्र मतमोजणीवेळी लागलेल्या निकालामुळे हे भाकित पूर्णपणे फोल ठरले आहे.
प्रथमच राष्ट्रीय पक्षाला बहुमत
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय पक्षाला बहुमत मिळाले आहे. वास्तविक पाहता ईव्हीएम मशीनच्या गोंधळामुळे मराठी भाषिकांना सत्तेपासून दूर राहण्याची वेळ आली असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी 20 नगरसेवक मराठी भाषिक असून अपक्ष आणि काँग्रेसमधून निवडणूक लढविलेल्या 14 उर्दू भाषिकांची वर्णी महापालिकेवर लागली आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच मराठी भाषिकांना अपयश पत्करावे लागले असून केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागत आहे. 8 अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे.
महापालिकेतील पक्षीय बलाबल
- भाजप-35
- काँग्रेस-10
- महाराष्ट्र एकीकरण समिती-4
- अपक्ष-8
- एमआयएम-1