मीरा माझी बालमैत्रीण!! त्या दिवशी खूप वर्षांनी भेटायला आली. आली ती एका वेगळय़ाच मूडमध्ये.. अगदी बालपणापासूनची हसरी मीरा कुठे हरवली आहे असा प्रश्न पडावा इतकी ती अस्वस्थ आणि उदास होती. शाळेत असतानाची मीरा आठवायची तर तशी ती सर्वांची लाडकी. अगदी एकमार्गी, शांत. ती कधी कुणाला दुखावत नसे, उलट उत्तर देत नसे. त्यामुळे कधी कुणाजवळ भांडण नाही. शांत असल्यामुळे सर्वांना तिचा सहवास आवडायचा. ती नसेल तर कुणालाच चैन पडायचे नाही. कारण नेहमी हसतमुख असणारी, कुणाच्याही मदतीला जाणारी अशी वेगळीच होती ती. त्यावेळी आनंदी असणारी मीरा त्यादिवशी इतक्या वर्षांनी भेटायला आली खरी परंतु ओळखता येणार नाही अशी तिची स्थिती होती. मीराशी संवाद सुरू असताना अधेमधे वारंवार तिला हुंदके अनावर होत होते.
बराच वेळ चर्चा झाल्यानंतर मीराचा हा स्वभाव आताच्या आयुष्यात अडथळा बनला होता. कुणालाही न दुखावणे म्हणजेच चांगुलपणा हे तिच्या मनावर कोरले गेले होते की तिला कुणाला नाही म्हणता येत नव्हते, अनेक गोष्टींच्याबाबतीत ठाम राहता येत नव्हते त्यामुळे आता हळूहळू बऱयाच गोष्टींचे ओझे होऊ लागले. नातेसंबंध, सततची ये-जा, सतत गृहित धरले जाणे, कोणत्याही बाबतीत तिचे मतही जाणून न घेणे, या गोष्टी वारंवार घडू लागल्या. आता तिला हा ताण सहन होत नव्हता. निश्चयपूर्वक वागणे, नाही म्हणणे न जमल्याने अनेक गोष्टी जुलमाचा रामराम करत कराव्या लागत होत्या. बराच काळ अशाच पद्धतीने वाटचाल सुरू असल्यामुळे तिला काही गोष्टी असह्य झाल्या होत्या. तिला आपण बदलायला हवे. जमत नसेल तर नाही म्हणायला हवे, आपले मत मांडायला हवे हे सारे कळत होते परंतु आपल्यावर कुटुंबात टीका केली जाईल असे तिला वाटत होते. परंतु चांगुलपणाचा हा मुखवटा सतत वागवत राहणे अवघड झाले होते. कशा पद्धतीने व्यक्त व्हायला हवे, काय केले पाहिजे हे जाणून घेण्यासाठी आणि अस्वस्थता दूर करण्याच्या उद्देशाने ती भेटायला आली होती. खरेतर निश्चयपूर्वक वर्तन हे एक कौशल्य आहे. ते आत्मसात करत असताना काही गोष्टी लक्षात घेणे स्वतःमध्ये प्रयत्नपूर्वक बदल करणे आवश्यक आहे. कारण ठामपणाच्या एका बाजूला भिडस्तपणा वा संकोचीपणा तर दुसऱया बाजूला आक्रमकता असते. खालील संवादातून तीनही स्वभावविशेष लक्षात येतील.
साहिल-समीर माझी कार दुरुस्तीला दिली आहे. तुझी कार देशील का दोन दिवस?
समीर-साहिल रागावू नको..पण मी नाही देऊ शकत. गाडीच्याबाबतीत मी जरा जास्तच काळजी घेतो. तुला ठाऊक आहेच.
साहिल-बरं बाबा, राहू दे. रमेश, तुझी गाडी मिळेल का?
रमेश-(एकदम ओरडत) काय संबंध? तुझी गाडी असताना लोकांकडे कशाला मागतोस. दोन दिवस शांत बस. एक तर तुला कसलीच शिस्त नाही. बेजबाबदार तू. तुझी गाडी दुरुस्त कर आणि हवी तेवढी वापर.
साहिल-अरे हो हो.. एवढा काय चिडतोस. रवीला विचारतो. ए रवी, तुझी गाडी दे की जरा दोन दिवस. अं..अं..बरं..ठीक आहे. पण गाडी द्यायची म्हणजे? प्लीज रे..अरे दोनच दिवसांचा प्रश्न आहे.
बरं जा घेऊन, पण नीट वापर रे बाबा. (साहिल खुश परंतु साहिलचे ड्रायव्हिंग आणि एकंदरच वागणूक यामुळे रवी कमालीचा अस्वस्थ)
वरचा संवाद निश्चयी वा खंबीर, आक्रमक, भिडस्त हे तीनही वर्तन प्रकार दाखविणारा आहे. काहीवेळा निश्चयी होताना आपण हट्टी, आक्रमक होत नाही ना याचे भान राखणेही गरजेचे असते. आक्रमक वा भिडस्त वर्तनापेक्षा निश्चयीपणाकडे वळणे गरजेचे आहे. योग्य शब्दात आपले म्हणणे मांडणे आणि आवश्यक तिथे नकार देणे यासाठी काही गोष्टी प्रयत्नपूर्वक लक्षात ठेवायला हव्यात.
1. एक व्यक्ती म्हणून मला स्वतःचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे.
2. एखादी गोष्ट समजली नाही तर ती मोकळेपणाने विचारण्याचा अधिकार आहे.
3. मनामध्ये अपराधीपणाची भावना न बाळगता एखाद्या गोष्टीला हो वा नाही म्हणण्याचा अधिकार आहे.
4. स्वतःचे निर्णय घेणे आणि त्या निर्णयाच्या चांगल्या अथवा वाईट परिणामांना सामोरे जाण्याचा अधिकार आहे.
5. मुलगा-मुलगी, भाऊ-बहीण, पती-पत्नी, पालक अशा नात्यांच्या विविध भूमिका त्यानुसार येणाऱया अपेक्षांखेरीज एक व्यक्ती म्हणून माझ्या गरजा ओळखण्याचा आणि त्याकडे लक्ष पुरवण्याचा अधिकार आहे.
6. इतरांच्या वर्तनाची जबाबदारी माझ्यावर येत नाही हे सांगण्याचा मला अधिकार आहे.
पहा, भिडस्तपणाकडून ठामपणाकडे वळताना या गोष्टींबाबत जागरुकता बाळगणे गरजेचे आहे. ‘आय एम ओ के,’ ‘आर यू ओ के’ अशा मानसिकतेकडे वळण्यासाठी निश्चयी वर्तन मोलाची भूमिका बजावते परंतु ठामपणासाठी काही तंत्रे आत्मसात करणे गरजेचे आहे.
देहबोली आणि संभाषण- आपले विचार दुसऱयापर्यंत पोहचवताना आपले बोलणे, शब्दफेक, आवाजातील चढउतार, स्वराची तीव्रता या बाबी जशा महत्त्वाच्या असतात तसेच आपल्या चेहऱयावरील हावभाव, हातपाय आदी अवयवांच्या हालचाली, ऊठ-बस करण्याची पद्धत अर्थातच देहबोली महत्त्वाची ठरते. आपले शब्द, व्यक्त होणाऱया भावना आणि देहबोली हे जर एकमेकांना पूरक नसतील तर गोंधळ उडू शकतो. स्वच्छ, सुस्पष्ट, आत्मविश्वासपूर्वक केलेले संभाषण दुसऱयापर्यंत नीट पोहचते. समोरच्या व्यक्तीने जर आपल्याला मत विचारले तर ते मोकळेपणाने स्पष्टता ठेवत मांडायला हवे. म्हणजे गैरसमज, गोंधळ, वादविवाद याची शक्मयता कमी होते.
उदा. राम- ए रमा कुठे जायचे फिरायला?
रमा-1) तू म्हणशील तिथे 2) मला गोव्याला जायला नक्की आवडेल.
पहा, पहिल्या उत्तरामध्ये संदिग्धता आहे. त्यामुळे रमाचे मत नेमकेपणाने रामला कळत नाही तर दुसऱया उत्तरामध्ये स्पष्टता आहे. त्यामुळे रमाचे मत रामला नीट कळेल आणि त्यांच्या संवादाला वेगळे वळण लागणार नाही किंवा निर्णय घेताना स्पष्टता राहील.
आय स्टेटमेंट- इथे ‘आय’ ‘मी’ या अर्थी आहे. मी, मला, माझे या शब्दांनी सुरुवात केली तर काय म्हणायचे आहे ते नेमकेपणाने कळते. ठामपणाचे कौशल्य अंगिकारण्यासाठी देहबोली आणि संभाषण, आय स्टेटमेंट यासोबतच अजूनही काही तंत्रे आत्मसात करणे गरजेचे आहे परंतु याविषयी अधिक जाणून घेऊया पुढच्या लेखात.
-ऍड. सुमेधा देसाई