आत्महत्या केलेल्या नवविवाहितेच्या नातेवाईकांचे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
अळवण गल्ली-शहापूर येथील एका नवविवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सासरच्या मंडळींवर कठोरात कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी त्या नवविवाहितेच्या नातेवाईकांनी आणि माहेरच्यांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले आहे.
मुस्कान रोहिम कागजी (वय 20, रा. अळवण गल्ली-शहापूर) असे त्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. तिला तिचा पती रोहिम इम्तियाज कागजी, सासरे इम्तियाज कागजी व हलिमा इम्तियाज कागजी हे वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देत होते. तिला माहेरकडून हुंडा घेऊन ये म्हणून मारबडव करत होते. यापूर्वी अनेकवेळा तिच्या सासरच्यांना ताकीद देण्यात आली होती. मात्र तरीदेखील तिचा जाच सुरूच होता. या जाचाला कंटाळून आमच्या मुलीने आत्महत्या केल्याचे निवेदनात म्हटले आहे.
अशाप्रकारे त्रास करणाऱयांना कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. तेव्हा तातडीने या सर्व सासरच्या मंडळींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी खंजर गल्ली परिसरातील नागरिकांनी तसेच त्या नवविवाहितेच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले.