हरिश रावत यांची घोषणा -आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार- राज्यात प्रथमच दलित समाजाच्या नेत्याला संधी
चंदिगढ / वृत्तसंस्था
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर 24 तासांनंतर अखेर पंजाबच्या नवीन ‘कॅप्टन’चे नाव निश्चित झाले. काँग्रेसचे दलित नेते चरणजीत सिंग चन्नी हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. पक्षाचे प्रभारी हरिश रावत यांनी ट्विट करून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून चन्नी यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती दिली. चन्नी यांच्या नियुक्तीसह पंजाबला पहिल्यांदाच दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणारा मुख्यमंत्री लाभणार आहे. रविवारी सायंकाळी चन्नी यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेत नव्या सरकारच्या स्थापनेचा दावा सादर केला. त्यानुसार सोमवारी सकाळी 11 वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.
पंजाबमध्ये मुख्यमंत्री निवडीसाठी रविवारी दिवसभर चर्चांचे सत्र सुरू होते. त्यानुसार अंबिका सोनी, सुखजिंदर सिंग रंधावा यांच्यासह बऱयाच नावांवर चर्चा झाली. या चर्चेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी मध्यवर्ती भूमिका घेतल्याचे दिसून आले. काँग्रेस प्रभारी हरिश रावत यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या विविध बैठकींअंती रविवारी सायंकाळी चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर अखेर एकमत झाले. चन्नी हे सलग तीनवेळा चमकौर साहिबमधून आमदार झाले. 2007 मध्ये ते अपक्ष म्हणून विजयी झाले. यानंतर ते दोनवेळा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. ते 2015-16 मध्ये पंजाब विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. ते रामदासिया शीख समुदायाचे आहेत. 2017 मध्ये, जेव्हा कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार स्थापन झाले, तेव्हा त्यांना तंत्रशिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण मंत्री करण्यात आले. अमरिंदर सिंग यांच्याविरोधात ऑगस्ट महिन्यापासून सुरू झालेल्या गटाचे नेतृत्व करणाऱयांमध्ये त्यांचा सहभाग होता.
रंधावा यांचे नाव पडले मागे…
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी मुख्यमंत्रिपदासाठी सुखजिंदर सिंग रंधावा (सुखी) यांच्या नावावर सहमती झाली होती, परंतु नवज्योत सिद्धू यांनी त्यांच्या नावाला असहमती दर्शवली. सिद्धू यांनी स्वतःला मुख्यमंत्री बनवण्याचा दावा केला होता, पण ते पंजाब काँग्रेसचे प्रमुख असल्यामुळे हायकमांडने त्यांच्या नावाला मान्यता दिली नाही. यानंतर सिद्धू गटामध्ये दलित मुख्यमंत्री बनवण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार चन्नी यांचे नाव पुढे आल्यानंतर सिद्धूंनी त्यांना होकार दर्शवताच हरिश रावत यांनी बैठकीतील निर्णय हायकमांडला कळवला. त्यानुसार हायकमांडने पुढील निर्णय घेण्याचे निर्देश दिल्यानंतर रंधावा यांचा पत्ता कट करून चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
अंबिका सोनी यांचा मुख्यमंत्रिपदाला नकार
दिवसभरातील चर्चेच्या फेऱयांमध्ये अंबिका सोनी यांचे नावही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. पंजाबचा मुख्यमंत्री एक शीखधर्मीय असावा असे मत व्यक्त करून त्यांनी मुख्यमंत्रिपदाला नकार दर्शवला. अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर अंबिका सोनी यांचे नाव सर्वात पुढे होते. अंबिका सोनी यांनी आरोग्याचे कारण देत त्यांनी मुख्यमंत्रिपदाला नकार दिला आहे. तसेच या पदावर कुठलीतरी शीख व्यक्ती असावी असे मतही व्यक्त केले. काँग्रेसच्या अनेक वरि÷ नेत्यांनी सोनी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण सोनी यांनी स्पष्ट नकार दिला आहे. सोनिया गांधी यांनी सोनी यांच्या नावावर शिक्कामोर्तबही केले होते. परंतु सोनी यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आणि या पदासाठी नकार दिला. अंबिका सोनी सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत. मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये त्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री होत्या. अंबिका सोनी गांधी कुटुंबियांच्या जवळच्या समजल्या जातात.
काँग्रेसची नजर दलित समुदायाच्या मतांवर
चन्नी यांच्या रुपाने काँग्रेसने पंजाबमधील 32 टक्के दलित व्होटबँकेवर नजर ठेवलेली दिसते. याशिवाय दलित उपमुख्यमंत्री बनवण्याचे अकाली दलाचे निवडणूक वचनही मोडले गेले. भाजपने दलित मुख्यमंत्री करण्याचे आश्वासनही दिले होते. दलित नेते हरपाल चीमा यांना पंजाब विधानसभेत विरोधी पक्षनेते बनवल्याचा दावा आम आदमी पक्ष करत होता. मात्र काँग्रेसच्या या निर्णयाने सर्वच पक्षांना राजकीय फटका बसला आहे.
दोन उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय
पंजाबमध्ये नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाचा निर्णय घेण्याबरोबरच दोन उपमुख्यमंत्री बनवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी अरुणा चौधरी आणि भारत भूषण आशु यांची नावे निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. हिंदू नेते भारत भूषण आशु 2012 आणि 2017 मध्ये लुधियाना पश्चिममधून आमदार म्हणून निवडून आले होते. ते कॅप्टन अमरिंदर सिंग सरकारमध्ये अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहारमंत्री देखील राहिले आहेत. तसेच ते सध्या पंजाब काँग्रेसचे माजी प्रमुख सुनील जाखड यांचे निकटवर्तीय मानले जातात. यापूर्वी ते प्रतापसिंह बाजवा यांच्या गटात होते. अरुणा चौधरी गुरदासपूरच्या दीनानगर येथील आमदार आणि दलित नेत्या आहेत. कॅप्टन सरकारमध्ये त्या सामाजिक सुरक्षा आणि महिला आणि बालविकास मंत्री राहिल्या आहेत. त्या 2002, 2012 आणि पुन्हा 2017 मध्ये दीनानगरमधून आमदार म्हणून निवडून आल्या. त्यांचे सासरे जय मुनी चौधरी सलग 25 वर्षे दीनानगरचे आमदार होते.