राजन तेली यांचा सवाल : विमानतळ कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी विचार करा!
प्रतिनिधी / कणकवली:
चिपी विमानतळाचे उद्घाटन 9 रोजी होत असून यानिमित्ताने जिल्हय़ातील जनतेची खूप वर्षाची इच्छा पूर्ण होत आहे. या विमानतळाचे श्रेय हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाच द्यावे लागेल. श्रेयासाठी धडपडणाऱया पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी या विमानतळासाठी पाण्याची व्यवस्था, लाईट, सुसज्ज रस्ता का दिला नाही. यासाठी कुणी हात बांधले होते का? उद्या मोपाचे विमानतळ सुरू झाल्यानंतर काय होईल? श्रेयासाठी धडपपडणाऱयांनी हे विमानतळ कायमस्वरूपी चालू रहावे यासाठी विचार केलाय काय? असा सवाल भाजप जिलाध्यक्ष राजन तेली यांनी केला आहे.
येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या विमानतळासाठीचे श्रेय नारायण राणेंना जाते याबाबत दुमत नाही. मात्र, आता आजी माजी पालकमंत्री, खासदार, आमदार श्रेयासाठी धडपडत आहेत. मात्र विमानतळासाठी जे पाणी लागणार आहे, त्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम केवळ 15 कि. मी. झाले आहे. अजून आठ कि. मी. लाईनचे काम बाकी आहे. या विमानतळासाठी 33 केव्हीची लाईन आवश्यक असताना केवळ 11 केव्हीची लाईन दिलेली आहे. रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. ही सर्व कामे राज्य शासनाच्या अखत्यारित आहेत. मग ही कामे करण्यासाठी कुणी विरोध केला होता की कुणी हात बांधले होते? असा सवाल तेली यांनी केला.
रस्त्यासाठीचा प्रस्ताव दोन वेळा पाठविला, मात्र, त्याला मंजुरी नाही. साधे खड्डे भरण्यासाठीही पैसे दिलेले नीहत. आजी माजी पालकमंत्री मोठय़ा घोषणा करतात, पण या छोटय़ा गोष्टी करण्यासाठीचीही त्यांची मानसिकता नाही. त्यांची मानसिकता असती तर ही कामे कधीच झाली असती, असेही तेली म्हणाले. म्हापणपासून पुढे रस्त्याच्या रुंदीकरणाचा विषय आहे. या रस्त्यासाठी हायवेप्रमाणे भूसंपादनासाठी निधी दिला असता तर काय झाले असते? एवढी वर्षे यासाठी लागली असती का? ही कामे करायला कुणी रोखले होते. या सर्व गोष्टींची पूर्वतयारी झाली नाही, तर उद्या मोपाचे विमानतळ झाल्यावर काय होईल? याचा कुणी विचार केलाय का? मोठेपण घ्या, घोषणा करा, पण या गरजांचे काय? त्या पूर्ण का केल्या नाहीत? एवढी वर्षे कशासाठी लागली याचीही उत्तरे द्या, असेही तेली म्हणाले.
क्रेडीट घेताना ज्या प्रामाणिक गरजा आहेत, त्या पूर्ण करायला काय होतंय?पर्यटन वाढीसाठी यांची भूमिका काय आहे? कर्ली खाडी येथे टर्मिनल्स केल्यास स्पीड बोटीच्या माध्यमातून पणजी, गोवा प्रवास होईल. तशी सोय करायला हवी. त्यासाठी टुर ऍरेंज करायला हव्यात. त्यासाठी केंद्राची मदत हवी असल्यास आम्ही नारायण राणेंच्या माध्यमातून द्यायला तयार आहोत. त्यातून पर्यटक आकर्षित होतील व एअरपोर्ट कायमस्वरूपी चालेल यासाठी प्रयत्न करायला हवेत. सी वर्ल्ड प्रकल्पाला गती द्यायला हवी. आपापसात भांडत बसण्यापेक्षा रोजगार निर्मिती व अशा लोकहिताच्या कामांसाठी एकत्रित येऊन हे प्रश्न सुटतील कसे? याबाबत विचार करायला हवा, असेही तेली म्हणाले.