प्रतिनिधी / करमाळा
करमाळा शहरात डेंग्यू व मलेरिया रोगाची लाट वाढू लागली आहे. ताप, सर्दी, खोकला या संसर्गजन्य आजारांचा प्रसार झाला असून यावर उपाययोजना करणे यासंदर्भात शिवसेनेसह अनेक पक्षांनी मागणी करूनसुद्धा नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे शहरवासी यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
करमाळा शहरातील सर्व रुग्णालय साथीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनी गच्च भरलेली आहेत. शहरात वाढलेली अस्वच्छता सर्व तुंबलेल्या गटारी उपलब्ध नसलेली जंतुनाशके सुस्त असलेली यंत्रणा स्वच्छता ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला पाठीशी घालणारे पदाधिकारी यामुळे शहरात डासांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सायंकाळी सात वाजल्यानंतर सर्वत्र मच्छर घोंगावत असताना दिसून येत आहेत. याबाबत नगरपालिका अजूनही खडबडून जागी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार करमाळा नगरपालिकेकडे चार धुरळणी मशीन आहेत. या सर्व मशीन्स गेली दोन दीड वर्षापासून बंद अवस्थेत आहेत. करमाळा शहर नगरपालिकेत कोणतेही जंतुनाशके उपलब्ध नाहीत. स्वच्छतेचा ठेका दिलेला ठेकेदार नाशिकचा असून त्यांनी नेमलेले कर्मचारी पैकी काही कर्मचारी काही नगरसेवकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गेली तीन चार महिन्यापासून पगार नसल्यामुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. शिवाय ठेकेदाराने शहर स्वच्छ करण्यासाठी लागणारी उपकरणे हत्यारे कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिलेली नाहीत.
याबाबत बोलताना महेश चिवटे म्हणाले की करमाळा नगर प्रशासन शहरवासीयांच्या जीवाशी खेळत आहे अशातच डेंगू झालेल्या रुग्णाला उपचारासाठी किमान दहा हजार रुपयांचा खर्च येत आहे. करमाळ्यातील कोणताही मेडिकल दुकानदार रुग्णांना बिल देत नाही. ज्या कंपनीच्या औषधात जास्त नफा आहे. अशाच कंपनीचे औषधे दुप्पट-तिप्पट किमतीने कोणत्याही प्रकारचे बील न देता रुग्णांच्या माथी मारले जात आहेत. डॉक्टर, मेडिकल व रक्त तपासणी केंद्रे मधून अवास्तव रकमा वसूल केल्या जात आहेत. याकडेही तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची कोणतेही लक्ष नाही. यामुळे शहरवासीयांना कोण वाली आहे का नाही असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे चिवटे यांनी सांगितले.