रशियाची तंबी, सर्वसमावेशक सरकारचा आग्रह
मॉस्को / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानात सर्वसमावेशक सरकारची स्थापना होणे आवश्यक आहे. तसेच त्या देशातून इतर देशांमध्ये दहशतवाद पसरणार नाही, याची शाश्वती त्या सरकारने देणे आवश्यक आहे, असा इशारा रशियाने दिला आहे. रशियात तालिबानसंबंधी बैठक होत आहे. या बैठकीत भारताचाही समावेश आहे.
रशियाचे विदेश व्यवहार मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी तालिबानला ही तंबी दिली. अफगाणिस्तानातून सध्या हजारोंच्या संख्येने स्थलांतरित बाहेर पडत आहेत. त्यामुळे आसपासच्या देशांमध्ये दहशतवाद आणि अंमली पदार्थांची तस्करी वाढण्याची शक्यता आहे. तलिबानचे सरकार त्या देशात स्थापन झाले असले तरी तेथील स्थिती स्थिरस्थावर झाली आहे, असे म्हणता येणार नाही. तालिबान सरकारचे अद्यापही या देशावर पूर्ण नियंत्रण नाही. तेथील कायदा-सुव्यवस्था स्थिती अद्यापी नाजूकच आहे. अशा स्थितीत त्या देशातून दहशतवाद इतरत्र फैलावण्याची दाट शक्यता आहे, असे लाव्हरोव्ह यांनी स्पष्ट प्रतिपादन केले.
भारताचे समर्थन
भारतात तालिबानी दहशतवाद पसरु नये अशी रशियाची इच्छा असून त्या दृष्टीने भारताला साहाय्य दिले जाणार आहे. अफगाणिस्तानच्या संदर्भात भारताची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे भारताला टाळून अफगाणिस्तानसंबंधी विचार करता येणार नाही, ही रशियाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हा जगाच्या चिंतेचा विषय
काश्मीरमध्ये दहशतवाद वाढीला लागणे हा केवळ भारताच्या नव्हे, तर जगाच्या चिंतेचा विषय आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये काश्मीर खोऱयात परिस्थिती शांत होती. तथापि, अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर पुन्हा काश्मीरमध्ये दहशतवाद डोके वर काढू लागला आहे. ही प्रक्रिया केवळ काश्मीरपुरती मर्यादित राहणार नाही. ती जगात अन्य देशांमध्येही पसरेल ही चिंता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अफगाणिस्तानला लागून असणाऱया ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांच्या संरक्षणाचे उत्तरदायित्व रशियाचे आहे. या देशांमध्ये तालिबानी दहशतवाद पसरला तर रशियासाठी ती मोठी डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे आता रशियाही तालिबानकडे संशयाच्या दृष्टीने पाहत असल्याचे तज्ञांचे मत आहे.