प्रतिनिधी/ कोरेगाव
काल-परवा किरीट सोमय्या येथे आला होता, मी अजितदादांना म्हटले आम्हाला परवानगी द्या, एकदाच त्याचा तोतरेपणा बाहेर काढतो, आपण रोज बघतोय, सकाळी ईडी लावायची, चौकशी सुरु होती, ईडी आणि इनकम टॅक्स आहे, नार्कोटिक्स आहे, काय राजकारण चाललय, याला लोकशाही म्हणतात का, अरे माझी कसलीही चौकशी लावा, मी ईडी, इनकम टॅक्सला घाबरत नाही, कोणाला काही करायचे असेल तर करा, आमच्यात दम आहे, असा इशारा देत आमदार शशिकांत शिंदे यांनी जर कोणी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टिका टिप्पणी करत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही, तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असे आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.
आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कठापूर येथे झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार निलेश लंके यांच्यासह आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजप चाललेल्या कुरघोडय़ा तसेच आमदार महेश शिंदे यांनी जिहे कठापूरचे केलेल्या जलपूजनावरुन सडकून टीका केली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सहकार खात्याच्या राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुंबई बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळस्कर-पाटील, कोरेगावचे सभापती राजाभाऊ जगदाळे, किरण साबळे-पाटील, शिवाजीराव महाडिक, अरुण माने, भास्कर कदम, राजूकाका भोसले, आनंदराव कणसे, अजयबापू कदम, कठापूरचे उपसरपंच किरण केंजळे, अशोकराव केंजळे, अनिल केंजळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले, माथाडी चळवळीतून आलेल्या शशिकांत शिंदे यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक काम केले आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देणारा आणि विकासकामे करणारा एकमेव संघर्षशील, ऊर्जावान व लढवय्या आमदार म्हणून ते ओळखले जातात. त्यांना पुन्हा एकदा कोरेगावचे आमदार बनवूया, असे प्रतिपादन पारनेरचे कोविड योध्दा आमदार निलेश लंके यांनी केले.
लंके पुढे म्हणाले की, संघर्षशील आणि ऊर्जावान नेता म्हणून संपूर्ण राज्यात आमदार शशिकांत शिंदे यांना ओळखले जाते. खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा एकनिष्ठ मावळा म्हणून ते सर्वत्र ओळखले जातात. ते खऱया अर्थाने वाघ आहेत, वाघ कधीही म्हातारा होत नाही, तो झेप कशी मारतो, हे सर्वजण जाणून आहेत. संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे, ते एकमेव वाघ आहेत. लढवय्या नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. माझ्यासारख्या सामान्य शेतकऱयाच्या मुलाला मुंबईत आधार देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांनी कोरोना काळात अत्यंत चांगले काम करत हजारो लोकांना जीवदान दिले आहे. कोरोना काळात अहोरात्र परिश्रम घेणाऱया धन्वंतरींचा त्यांनी गौरव केला, ही आनंदाची बाब आहे. गोरगरिबांबाबत तळमळ असलेले हे जनतेचे नेतृत्व आहे, त्यांनी आपल्या मतदारसंघात कोटय़वधी रुपयांची विकासकामे मार्गी लावली आहेत, त्यांनी विकासाची गंगोत्रीच मतदारसंघात आणली आहे.
जिहे-कठापूर योजनेला जलसंपदा मंत्रिपदाच्या माध्यमातून त्यांनी 180 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. वसना-वांगणा योजना 1200 कोटी रुपये खर्चुन पूर्ण केली. शेतकरी, तरुण आणि बेरोजगारांसाठी अष्टपैलू खेळाडू म्हणून ते ओळखले जातात. आज अहमदनगरमध्ये माझ्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार होते, मात्र मी तो कार्यक्रम रद्द करुन आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आलो, त्यांचे जनतेशी असलेले नाते पाहून आनंद वाटला, यापुढे प्रत्येक वाढदिवसाला मी न चुकता येणारच, असेही आमदार निलेश लंके यांनी स्पष्ट केले.
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, कोरोना काळात केलेल्या कामाचा कधीही श्रेयवाद घेण्याचा मी प्रयत्न केला नाही, जेव्हा माणूस मोठा होतो, तेव्हाच त्याच्यावर टिका होत असते. आम्ही आमच्या पध्दतीने कामे केली, शासकीय रुग्णालय मी मंजूर केले, या मतदारसंघात जेवढी जेवढी विकासकामे केली, ती मीच केली, मात्र त्याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न आम्ही केला नाही.
संपूर्ण देशात सर्वपरिचित असलेला कोविड योध्दा आमदार निलेश लंके यांच्या कामाची पध्दत पाहून काही जणांनी कोरोना रुग्णांना मिठय़ा मारण्याचा प्रयत्न केला. म्हणे काय तर कोविड सेंटर काढले, बिल किती तर 70 ते 80 हजार रुपये, मेडिकल दुकान यांचेच, रेमडेसेवीर इंजेक्शन सरकारचे, मात्र मिळते कोठे तर यांच्याच मेडिकल दुकानात, पेशंट सिरीयस झाल्यास आहे की पंढरपूरचे हॉस्पिटल. हे आम्हाला काही माहीत नाही का, मात्र आजवर आम्ही बोललो नाही, आता सर्व काही बोलणार. सरकारकडून कोरोनाच्या नावाखाली कोण पैसे मागतेय, हे लवकरच जगजाहीर करणार आहे, असा स्पष्ट इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला. समोर बसलेली जनता माझी ताकद आहे, पराभव झाला तो अपघाताने झाला, तो भाजपच्या कटकारस्थानाने झाला, पराभव झाला तो जिह्याच्या राजकारणातून झाला, पण शशिकांत शिंदे अल्पमतात आला, असे होत नाही. 25 वर्षे राजकारणात आहे, कधीही व्यक्तीगत हणन केलेले नाही, दिड वर्षात डोक्यात हवा, लोकांमध्ये आरेतुरे सुरु केले, माझ्या कार्यकर्त्यांवर खोटय़ा केसेस करण्याचा प्रयत्न केला, राजकारण लोकांच्या प्रेमाने टिकत असते, अपघाताने झालेले आमदार पुन्हा अपघातानेच निघून जातात, त्याला मी तयार आहे, असे खुले आव्हान त्यांनी दिले.
यावेळी कोरोना काळात उल्लेखनीय काम केलेल्या डॉक्टरांचा विशेष गौरव करण्यात आला. आमदार निलेश लंके यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. अशोकराव केंजळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुनील माने, भास्कर कदम यांची भाषणे झाली. अनिल केंजळे यांनी आभार मानले.
आमदार शशिकांत शिंदे हे सुर्यच… त्यांना कोणी झाकू शकत नाही
खासदार शरद पवार, ना. अजितदादा पवार यांच्यापाठोपाठ ऊर्जावान नेतृत्व म्हणून आमदार शशिकांत शिंदे हे संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातात. त्यांच्याकडे पाहिल्यावर आपल्यातच ऊर्जा निर्माण होते. ते सुर्य आहेत, त्यांना कोणीही तळहाताने झाकू शकत नाही, सुर्य हा सुर्यच असतो, असेही आमदार निलेश लंके यांनी स्पष्ट केले.
आयत्या पिठावर रेघोटय़ा, आयत्या बिळावर नागोबा…. !
जिहे-कठापूरच्या पाण्याचे पूजन झाल्याचा संदर्भ येताच आमदार निलेश लंके यांनी आमदार महेश शिंदे यांचा नामोल्लेख टाळत अरे दिवसा करा की, लोक झोपेत असताना, असे चुकीच्या पध्दतीने करणे योग्य नाही, असा मार्मिक चिमटा काढत त्यांनी तुम्हाला आमची काही अडचण आहे का, आमदार शशिकांत शिंदे यांनी मंजूर केलेल्या कामांचे नारळ तुम्ही फोडा ना, आम्हाला काही अडचण नाही. आमच्या साहेबाला तेवढा वेळही नाही, जनतेच्या कामाला महत्व देणारा आमचा नेता आहे, आयत्या पिठावर रेघोटय़ा आणि आयत्या बिळावर नागोबा असे लयं दिवस चालत नाही, असे स्पष्ट करुन जनता एकवेळ भुलते, दुसऱयांदा ध्यानात ठेवते, आमचा नेता भक्कम आहे, जनतेचे प्रलंबित असलेले सर्व प्रश्न पूर्णतः सोडविल्याशिवाय स्वस्थ बसणारा आमचा नेता नाही, त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी कार्यकर्त्यांनी शिट्टय़ा वाजवत जोरदार जयघोष केला.