माजी ऑस्ट्रेलियन सलामीवीर, पाकिस्तानचा फलंदाजी सल्लागार मॅथ्यू हेडनचे प्रतिपादन, ‘मदर ऑफ ऑल बॅटल्स’चे अवघ्या क्रीडा विश्वाला वेध
वृत्तसंस्था /कराची
आयसीसी टी-20 विश्वचषक सुपर-12 फेरीत भारत-पाकिस्तान यांच्यात रविवारी (दि. 24) होणाऱया सलामी लढतीत दोन्ही संघांच्या कर्णधारांचा कस लागेल आणि या प्रतिकूल स्थितीत दडपण कसे हाताळले जाते, त्यावरच सामन्याचा निकाल अवलंबून असेल, असे प्रतिपादन माजी ऑस्ट्रेलियन सलामीवीर मॅथ्यू हेडनने केले. भारत-पाकिस्तान यांच्यातील ‘मदर ऑफ ऑल बॅटल्स’चे अवघ्या क्रीडा विश्वाला वेध लागले असून त्या पार्श्वभूमीवर हेडन बोलत होता. स्वतः हेडन सध्या पाकिस्तानी संघाचा फलंदाजी सल्लागार म्हणून कार्यरत आहे.
मॅथ्यू हेडनने यावेळी महेंद्रसिंग धोनी व इयॉन मॉर्गन यांचे आयपीएल आवृत्तीतील यशाचे उदाहरण दिले. वैयक्तिक कामगिरी अपेक्षेनुरुप होत नसली तरी संघनेता या नात्याने संघाला कसे लक्षवेधी यश मिळवून देता येते, हे धोनी व मॉर्गन यांनी दाखवून दिले असल्याचे हेडन म्हणाला.
‘वास्तविक, धोनी व मॉर्गन हे दोघेही दिग्गज क्रिकेटपटू सध्या आपल्या सर्वात खराब फॉर्ममध्ये आहेत. ते त्यांच्या लौकिकाला खेळ साकारु शकलेले नाहीत, हे केव्हाही मान्य करावे लागेल. मात्र, यानंतरही त्यांनी युएईमध्ये संपन्न झालेल्या आयपीएलच्या दुसऱया टप्प्यात संघाकडून अतिशय दर्जेदार कामगिरी करवून घेतली. इथे नेतृत्व महत्त्वाचे ठरले’, याचा हेडनने येथे उल्लेख केला.
आझमवर बरेच दडपण
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर या लढतीत विशेष दडपण असेल, हे देखील हेडनने खुल्या दिलाने कबूल केले. ‘कर्णधार व अव्वल फलंदाज अशी दुहेरी जबाबदारी हाताळताना त्याला बरेच दडपण झेलावे लागेल आणि ते साहजिकही आहे. कारण, कोणत्याही परिस्थितीत त्याला थेट जबाबदार धरले जाईल. मात्र, बाबरकडे नेतृत्वाची क्षमता आहे आणि जबाबदारीला न्याय देण्याचे कसब त्याच्याकडे आहे. हेच त्याचे बलस्थान असेल’, असे हेडन पुढे म्हणाला.
‘ऑस्ट्रेलियन खेळाडू, चाहता या नात्याने माझ्यासाठी ऍशेस आणि इंग्लंडविरुद्धचे सामने सर्वाधिक महत्त्वाचे असतात. त्याच तोलामोलाने किंवा त्याहून अधिक भारत-पाकिस्तानच्या लढती रंगतात. यंदा पाकिस्तानी संघात बाबर, रिझवान, फखर झमन हे मुख्य खेळाडू आहेत. पण, याआधीच त्यांच्यावर बरेच दडपण निर्माण झालेले आहेत. त्यात मी आणखी भर घालू शकत नाही’, असे तो याप्रसंगी म्हणाला.
केएल राहुल, रिषभ पंतकडून पाकिस्तानला मुख्य धोका!
मागील बऱयाच वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा प्रवास पाहत आलेल्या हेडनने रविवारच्या लढतीत पाकिस्तानला केएल राहुल व रिषभ पंत यांच्याकडून मुख्य धोका असल्याचा अंदाज वर्तवला आहे. ‘केएल राहुलने अल्प कालावधीत बरीच प्रगती केली असून त्याच्या खेळात प्रगल्भता आहे. छोटय़ा क्रिकेट प्रकारात मी त्याला झगडताना पाहिले आहे आणि वर्चस्व गाजवताना देखील पाहिले आहे. त्याची एकंदरीत क्षमता पाहता, पाकिस्तानसाठी तो मुख्य अडथळा असेल’, असे निरीक्षण हेडनने नोंदवले.
रिषभ पंतचा देखील त्याने येथे खास उल्लेख केला. ‘रिषभ पंत विस्फोटक फलंदाज आहे आणि प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चिंधडय़ा उडवण्याची हुकूमत त्याच्याकडे आहे. अलीकडील कालावधीत त्याने आपल्या खेळावर बरीच मेहनतही घेतली आहे. पाकिस्तानविरुद्ध लढतीत स्वतःचे नाणे खणखणीत वाजवून दाखवण्यासाठी हा दिग्गज यष्टीरक्षक-फलंदाज सज्ज आहे. त्यामुळे, त्याच्यापासूनही पाकिस्तानला सावध रहावे लागेल’, असे हेडन शेवटी म्हणाला.
भारत-पाकिस्तान सामना पहा मल्टीप्लेक्समध्ये : प्रेक्षक आकर्षित करण्यासाठी पुण्यात चित्रपटगृहचालकांची क्लुप्ती
पुणे : टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यात रंगणारा सामना पुण्यातील विविध मल्टिप्लेक्स दाखविण्यात येणार असून, त्यासाठी चारशे ते हजार रुपयांचे तिकीट ठेवण्यात आले आहे. उद्यापासून (शुक्रवार) चित्रपटगृह खुली होणार आहेत.
गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे चित्रपटगृहे बंदच ठेवण्यात आल्यामुळे चित्रपट पाहण्याच्या आनंदाला प्रेक्षकवर्ग मुकला होता. चित्रपटगृहे खुली झाली तरी, किती पेक्षक चित्रपटगृहात येतील, याचा अंदाज घेऊनच निर्माते नवीन चित्रपटे प्रदर्शित करण्याच्या मानसिकतेत आहेत. नवीन चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतिक्षाच करावी लागणार आहे. मात्र, पहिला आठवडा रिकामा जाऊ नये, यासाठी चित्रपटगृह चालकांनी भारत-पाकिस्तान सामना दाखण्याची क्लुप्ती लढवली आहे. ही क्लुप्ती किती यशस्वी होईल, प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
टी-20 वर्ल्डकपमधील 5 लढती, पाचही वेळा भारत विजयी!
1) 14 सप्टेंबर 2007 (दरबान) : भारत बॉल-आऊटवर विजयी
टी-20 वर्ल्डकपच्या उद्घाटनाच्या आवृत्तीत भारत व पाकिस्तान हे दोन्ही कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी एकाच गटात होते. भारताने प्रथम फलंदाजी करताना 141 धावा फलकावर लावल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने देखील तितक्याच धावा जमवल्या आणि हा सामना टाय झाला. त्यानंतर सामन्याचा निकाल बॉल-आऊटवर घेण्यात आला आणि भारताने त्यात एकतर्फी बाजी मारली.
2) 24 सप्टेंबर 2007 (जोहान्सबर्ग) : भारत 5 धावांनी विजयी
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने उद्घाटनाची टी-20 वर्ल्डकप जिंकली आणि फायनलमध्ये भारताचा प्रतिस्पर्धी होता पुन्हा एकदा पाकिस्तान! जोहान्सबर्गमधील वांडरर्स स्टेडियमवर रंगलेल्या रोमांचक फायनलमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध 5 धावांनी निसटती बाजी मारली.
3) 30 सप्टेंबर 2012 (कोलंबो) : भारत 8 गडी राखून विजयी
श्रीलंकन राजधानी कोलंबोमध्ये भारताने सुपर-8 फेरीतील लढतीत पाकिस्तानचा 8 गडी राखून धुव्वा उडवला. आश्चर्य म्हणजे, या सामन्यात विराट कोहलीने 3 षटके गोलंदाजी केली आणि यात मोहम्मद हाफीजचा बळीही घेतला.
4) 21 मार्च 2014 (ढाका) ” भारत 7 गडी राखून विजयी
भारताचा टी-20 वर्ल्डकपमधील हा सर्वात सहज विजय ठरला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात केवळ 130 धावा केल्या. अमित मिश्राने 22 धावात 2 बळी घेतले. शिवाय, 1 षटक निर्धावही टाकले. कोहलीने 32 चेंडूत सर्वाधिक 36 धावांचे योगदान दिले.
5) 19 मार्च 2016 (कोलकाता) : भारत 6 गडी राखून विजयी
पाकिस्तानने पुन्हा एकदा प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, त्यांना 20 षटकात 118 धावांवरच समाधान मानावे लागले. भारताचा विजय गृहित धरला जात होता. पण, मोहम्मद आमीरच्या रोहित शर्मा व विराट कोहलीला टाकलेल्या भेदक स्पेलमुळे काही काळ का होईना रंगत निर्माण झाली होती. अंतिमतः भारताने हा सामना 6 गडी राखून जिंकला.
टी-20 मधील उभयतांची कामगिरी
विराट कोहली बाबर आझम
- 32 वय 26
- 90 सामने 61
- 3159 धावा 2204
- 52.65 सरासरी 46.89
- 94* सर्वोच्च 122
- 0 शतके 1
- 28 अर्धशतके 20 4
- आयसीसी रँकिंग 2