नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन : म. ए. युवा समितीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
प्रतिनिधी /कोल्हापूर
सीमाबांधवांच्या लढय़ाला शिवसेनेने नेहमीच बळ दिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सीमावासियांच्या पाठीशी राहण्याची भूमिका होती. तीच भूमिका शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आहे. सीमाभागातील सर्व संघटनांनी एकत्र येऊन एकदिलाने सीमालढा पुढे न्यावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आहे. त्यानुसार सीमावासियांनी एकदिलाने सीमालढय़ासाठी पुढे यावे, असे आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यादरम्यान महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शिष्टमंडळाने मंत्री शिंदे यांची भेट घेऊन 1 नोव्हेंबर रोजी सीमाभागाप्रमाणे महाराष्ट्रातही काळादिवस पाळण्यात यावा, अशी मागणी केली.
मंगळवार पेठेतील सुबराव गवळी तालीम मंडळाच्या नूतन इमारतीच्या पायाभरणी सोहळय़ासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी कोल्हापूर दौऱयावर होते. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दूधवाडकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.
मंत्री शिंदे म्हणाले, बेळगाव, खानापूर, निपाणी, बिदर, भालकी, कारवारसह संपूर्ण सीमावासियांचा महाराष्ट्रावर अधिकार आहे. संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात यावा, यासाठी शिवसेना नेहमीच प्रयत्नशील असून सीमावासियांच्या पाठीशी आहे. सीमालढय़ातील न्यायप्रविष्ट असलेल्या बाबींबाबत शिवसेनेकडून पाठपुरावा सुरू आहे. यासाठी तज्ञ वकिलांची फौजही तैनात करण्यात आली आहे. सीमालढय़ाला शिवसेनेचे नेहमीच पाठबळ राहणार आहे. सीमाभागातील संघटनांनीही एकत्र येऊन एकदिलाने लढा द्यावा, असे आवाहन मंत्री शिंदे यांनी केले.
यावेळी पुष्पगुच्छ देऊन मंत्री शिंदे यांचा समितीकडून सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष सूरज कुडुचकर, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, सचिव श्रीकांत कदम, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, तालुका प्रमुख सचिन गोरले, नारायण मुचंडीकर, वासू सामजी, प्रवीण रेडेकर, राजू कदम, सिद्धार्थ चौगुले, जोतिबा पाटील, आशिष कोचेरी आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातही काळादिन पाळावा
सीमाभागातील जनता 1 नोव्हेंबरला काळादिन पाळून निषेध नोंदवत आली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातही 1 नोव्हेंबर हा काळादिन म्हणून पाळण्यात यावा आणि निषेध नोंदवत संपूर्ण महाराष्ट्र सीमावासियांच्या पाठीशी आहे, हे दाखवून द्यावे. तसेच खासदार, आमदार यांच्यासह लोकप्रतिनिधीनींही या दिवशी काळे कपडे परिधान करून अथवा फिती लावून निषेध नोंदवावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शिष्टमंडळाने मंत्री शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. तसेच विविध मागण्यांचे निवेदनही मंत्री शिंदे यांना दिले.