प्रतिनिधी / कणकवली:
रा. प. महामंडळाच्या कर्मचाऱयांनी शासन सेवेत विलिनीकरणासाठी सुरू केलेले कामबंद आंदोलन गुरुवारी अकराव्या दिवशीही सुरूच होते. दरम्यान, याप्रकरणी सिंधुदुर्ग विभागातील आणखी 15 कर्मचाऱयांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली. त्यामुळे निलंबित कर्मचाऱयांची संख्या 32 झाली आहे.
बुधवारी रोजंदारीवरील कर्मचाऱयांना कामावर हजर होण्यासाठी नोटीस देण्यात आलेली होती. हजर न झाल्यास सेवामुक्ती करण्यात येईल, असे म्हटले होते. मात्र, याप्रकरणी उशिरापर्यंत कुणावरही कारवाई करण्यात आलेली नव्हती. दुसरीकडे कामावर हजर न झाल्याप्रकरणी विभागीय कार्यशाळेतील आठ, सावंतवाडी आगारातील सहा व कुडाळ आगारातील आणखी एक अशा 15 कर्मचाऱयांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग विभागातून निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱयांची संख्या आता 32 झाली आहे.
दरम्यान, गुरुवारी अकराव्या दिवशीही सिंधुदुर्ग विभागातील एसटी वाहतूक 100 टक्के बंद राहिली होती. तसेच कामगार हजर न झाल्यास कारवाईची संख्या वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.