प्रतिनिधी /बेळगाव
तालुक्याच्या पूर्व भागामध्ये बससेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असल्याने विद्यार्थी वर्गाची गैरसोय होत आहे. बससेवा सुरळीत करण्याबाबत वारंवार मागणी करून देखील याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
पूर्व भागातील बसवन कुडची, निलजी, शिंदोळी, बसरीकट्टी, सांबरा, मुतगा, बाळेकुंद्री खुर्द, होनीहाळ, पंत बाळेकुंद्री, मोदगा, मारीहाळ, सुळेभावी व कर्डीगुद्दी येथून दररोज शिक्षणासाठी बेळगावला येणाऱया विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. या सर्व विद्यार्थ्यांना राज्य परिवहन मंडळाच्या बससेवेवर अवलंबून राहावे लागते. अनेक वेळा बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर शाळा-महाविद्यालयांना पोहोचता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच या भागातील बससेवा विस्कळीत झाल्याने खासगी प्रवासी वाहतूक फोफावली आहे.
सकाळच्या वेळी बेळगावला जाणाऱया विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे सकाळच्यावेळी या भागात जास्त बसफेऱया सोडण्याची मागणी करण्यात येत आहे. सुळेभावी, पंत बाळेकुंद्री येथून बेळगाव शहराकडे जाणाऱया बसेस तिथूनच पूर्णपणे भरून येत असल्याने बसवाहक अनेकवेळा बस न थांबताच बेळगावकडे निघून जातो. तर एखाद्या वेळेस बस थांबली तरी बसच्या दरवाजावर थांबून विद्यार्थ्यांना धोकादायक प्रवास करावा लागतो. सोमवारी बसमध्ये चढताना गर्दीमुळे पायरी वरून पडून एक विद्यार्थी जखमी झाला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य परिवहन मंडळाने तातडीने या भागातील बस फेऱयाची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.
सांबरा गावाला स्वतंत्र बस सोडण्याची मागणी
सांबरा गावाला यापूर्वी स्वतंत्र बस सोडण्यात आली होती. त्यामुळे येथील विद्यार्थी व नागरिकांना त्या बसचा लाभ होत होता. मात्र लॉक डाऊन झाल्यापासून येथील बससेवा रद्द करण्यात आली आह. त्यामुळे येथील प्रवाशांना परगावच्या बसवर अवलंबून राहावे लागत आहे. अशाने आणखीनच गैरसोयीत भर पडत आहे. तरी गावाला स्वतंत्र बस तातडीने सुरू करावी, यासाठी मंगळवारी येथील विद्यार्थ्यांनी डेपो मॅनेजरना निवेदन दिले आहे. गावाला स्वतंत्र बस सुरू करावी, किंवा दररोज सकाळी 7ः20, 7ः40, 8ः30, 9ः00, 9ः30 व 10 वाजता जादा बसफेऱया सोडाव्यात, अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.