प्रतिनिधी / सातारा :
आगामी नगर पंचायती, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी रणनीती ठरवताना सक्षम उमेदवार उभे करण्याबरोबरच पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी बूथ रचना पूर्ण करून घ्यावी आणि संपर्क वाढवावा. कोणत्याही परिस्थितीत भाजपा या निवडणूका पूर्ण ताकतीने लढवणार असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सांगितले.
सातारा जिल्हा भाजप कार्यकारिणी बैठक आज वाई येथे झाली. यावेळी पावसकर बोलत होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय एकता, अखंडता राखण्यासाठी, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अखंडपणे काम करत आहेत. त्यामुळे भारत देश जागतिक पातळीवर सक्षम आणि सामर्थ्यशाली देश ठरला आहे. भारतामध्ये लसीचे उत्पादन चांगल्या प्रकारे झाले आणि भारताने जगाला मार्गदर्शन केले. भारतामध्ये एकशे दहा कोटीच्या वर लोकांचे लसीकरण झाले आहे आणि हा एक जागतिक विक्रम आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून 80 कोटी लोकांना मोफत धान्य वितरण करण्यात आले आणि त्याची मुदत अजून चार महिने वाढवण्यात आले आहे.
महाराष्ट्रात राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे. राज्याचे अनेक मंत्री भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, कारखान्यांच्या जमिनी लाटणे, पोलीस प्रशासनावर दबाव आणून मनाला वाटेल ती कामे करून घेणे या आणि अशा अनेक प्रकारच्या गैर कृत्यांमध्ये गुंतलेले आहेत. जावयाला वाचण्यासाठी एक मंत्री अधिकाऱ्यांवर खालच्या स्तरावर जाऊन आरोप करत आहेत. मुख्यमंत्री घरात बसून असून त्यांचा शासनावर वचक राहिला नाही. शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये दिले नाहीतच परंतु त्यांची वीज सुद्धा कापली. अशा अनेक घटनांच्या निषेधासाठी राजकीय प्रस्ताव मांडून बैठकीत राज्य शासनाचा निषेध करण्यात आला.
या बैठकीला सर्व जिल्हा सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस कार्यकारिणी सदस्य, सर्व मंडल अध्यक्ष आणि सरचिटणीस आदी पदाधिकाऱ्याची उपस्थिती होती.