जुन्या काळात मनोरंजनाची साधने आजच्या तुलनेत खूप कमी होती. त्यामुळे त्याकाळी नाटक ह्या जिवंत कलेचा उदय झाला. ह्यात कलेचा प्रत्यक्ष आनंद आणि अनुभव रंगकर्मी, नट आणि प्रेक्षकांना घेता येऊ लागला. ह्याच नाटय़कलेचा झपाटय़ाने विकास झाल्याने अनेक उत्तम रंगकर्मी आणि नट हे जुन्या काळात होऊन गेले.
एका गावात एक तरुण रंगकर्मी होता. गावात जत्रा असल्याने त्या रंगकर्मीने नाटक करण्याचे ठरवले. गावातील जत्रेच्या आयोजकांना तो जाऊन भेटला. त्याने त्याचा विचार आयोजकांना सांगितला. आयोजकांनी सुरुवातीला त्याला परवानगी नाकारली. त्यामुळे त्याने गावातील प्रति÷ित लोकांना ह्याविषयी सांगितले. त्यांनी गावकऱयांशी चर्चा करून ह्याबाबत निर्णय देण्याचे ठरवले.
काही दिवसांनी आयोजकांनी त्या तरुण रंगकर्मीला नाटकाचा प्रयोग सादर करण्याची परवानगी दिली. त्या तरुणाने नाटक सादर करण्यापूर्वीची सगळी तयारी पूर्ण केली. नाटकाची संहिता एका उत्तम लेखकाकडून लिहून घेतली. नाटकातील तांत्रिक बाबींची पूर्तता केली. तंत्रज्ञांशी चर्चा केली आणि त्यांच्यावर तांत्रिकदृष्टय़ा प्रयोग उत्तम व्हावा म्हणून जबाबदारी सोपवली.
अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाटकाची तालीम करण्याकरिता नट-नटींची जुळवाजुळव करणे त्याने सुरू केले. त्यांच्याकडून संहितेचे अभिवाचन करवून घेतले. त्यानंतर संपूर्ण नाटक पाठ करवून घेतले. मग नाटकाची तालीम करण्यास प्रारंभ केला. काही दिवस तालीम उत्तम पद्धतीने झाल्यावर त्या रंगकर्मीला त्या तालमीत कुठेतरी अपूर्णता दिसत होती. काहीतरी करण्याचे राहून गेले आहे असे त्या तरुणाला सतत वाटत होते. पण, ह्याविषयी काय करावे? कोणाला विचारावे? हे त्याला कळत नव्हते.
एके दिवशी तालीम सुरू असताना अचानक तेथे नाटकाचे लेखक आले. त्यांनी संपूर्ण तालीम बघितली. त्यांनी त्या तरुण दिग्दर्शकाला त्यांच्या घरी भेटायला बोलवले. ठरल्याप्रमाणे तो तरुण त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेला. लेखकाने त्या तरुणाशी नाटकाच्या तालमीविषयी बोलायला सुरुवात केली. त्यात त्यांनी त्याला नाटकातील प्रत्येक नटाने आणि नटीने स्वतःच्या पत्रांचा नीट शोध घेतला नाही हे सांगितले. लेखकाने नेमक्मया शब्दात त्या तरुण दिग्दर्शकाला अपेक्षित असलेली गोष्ट सांगितली आणि त्याला तालमीतील अपूर्णता लक्षात आली.
दुसऱया दिवशी त्या तरुण दिग्दर्शकाने तालीम घेत असताना कलाकारांना त्यांच्या पात्रांचा शोध घेण्यास सांगितले आणि राहिलेली उणीव भरून काढली. पुढे काही दिवसांनी नाटकाचा प्रयोग गावातील जत्रेत झाला आणि लोकांच्या नाटक पसंतीस उतरले. त्या नाटकाचे अनेक प्रयोग
झाले.
व्यवस्थापन शास्त्रातसुद्धा अनेकवेळा कार्यपद्धती, कार्याचे संचालन खूप उत्तम रित्या पार पडते पण बऱयाच गोष्टी राहून जातात आणि ह्या राहिलेल्या बाबींमुळेच अपेक्षित परिणाम हा संबंधित उद्योग समूहाला आणि औद्योगिक संस्थेला मिळत नाही. अशावेळी आवश्यकता असते ती अंतर्गत प्रशिक्षणाची किंवा बाहेरील तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाची! व्यवस्थापन क्षेत्रात अनेक वर्षांपूर्वी व्यवस्थापकीय प्रशिक्षक, व्यवस्थापकीय मार्गदर्शक किंवा ण्दज्दा ऊraग्ही ही संकल्पना सुरू झाली आणि आजच्या काळात ह्याची व्याप्ती मोठय़ा प्रमाणात वाढायला लागली आहे.
श्रीसमर्थांनी श्रीमददासबोध ग्रंथात शिकवणनाम दशकात ह्याविषयी असे म्हटले आहे की,
उत्तम गुण प्रगटावे।मग भलत्यांसी बोलतां फावे।
भले पाहोंन करावे । शोधून मित्र।।
उपासनेसारिखें बोलावें। सर्व जनास तोषवावें।
सगट बरेंपण राखावें।कोण्हीयेकासी।।
ठाईं ठाईं शोध घ्यावा।मग ग्रामीं प्रवेश करावा।
प्राणीमात्र बोलवावा । आप्तपणें।।
उंच नीच म्हणो नये। सकळांचे निववावें हृदये ।
अस्तमानीं जाऊ नयें। कोठें तरी ।।
जगामघ्यें जग मित्र। जिव्हेपासीं आहे सूत्र ।
कोठे तरिं सत्पात्र ।शोधून काढावें ।।
कथा होती तेथें जावें।दुरी दीनासारिखें बैसावें।
तेथील सकळ हरद्र घ्यावें।अंतर्यामीं ।।
सकळामधें विशेष श्रवण। श्रवणाहून थोर मनन।
मननें होय समाधान । बहुत जनांचे ।।
धूर्तपणें सकळ जाणावें ।अंतरी अंतर बाणावें।
समजल्याविण सिणावें । कासयासी ।।
19/02/15-16-17-18-19-20-22-23
ह्याचा अर्थ असा आहे की, आपल्यातील उत्तम गुण दर्शवावे. त्यामुळे आपल्या बोलण्याला किंमत प्राप्त होते. सज्जन माणसांशी स्नेह जोडावा. उपासनेला जे आवश्यक आहे ते बोलावे. सर्वांना संतुष्ट करावे आणि सर्वांशी चांगले संबंध ठेवावे. गावात प्रवेश करण्यापूर्वी तेथील पूर्ण माहिती काढूनच प्रवेश करावा. आपल्याप्रमाणे इतरांना मानून त्यांच्याशी योग्य वागावे. कुणाशीही भेदभाव करू नये. सूर्यास्तानंतर मुक्कामाची जागा सोडू नये. ज्यांना जगमित्र व्हायचे आहे त्यांच्या जिभेपाशी सूत्र आहे. आयुष्यात यशस्वी होण्याकरिता ऐकणे, श्रवण करणे खूप महत्त्वाचे आहे. श्रवणापेक्षा मनन करणे मोठे आहे. अतिशय चतुराईने सर्व जाणून घेऊन दुसऱयाच्या अंतरंगाशी आपले अंतरंग जोडावे. हे लक्षात न घेता केवळ श्रम करण्यात काहीही अर्थ नाही.
ज्यांना उत्तम व्यवस्थापकीय मार्गदर्शक व्हायचे असेल त्यांनी श्रीसमर्थांनी सांगितलेल्या ह्या लक्षणांचा अभ्यास करावा. प्रपंच हा नाटकाच्या तालमीसारखा आहे तर परमार्थ हा नाटकाचा सर्वोत्तम प्रयोग आहे. हे ज्यास समजले तोच उत्तम साधक, व्यक्ती आणि व्यवस्थापक होऊ शकतो.
माधव श्रीकांत किल्लेदार