दिवंगत बिपिन रावत यांना पंतप्रधान मोदींची श्रद्धांजली
लखनौ / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथे सरयू कालवा राष्ट्रीय प्रकल्पाच्या उद्घाटनाला हजेरी लावली. यावेळी पंतप्रधानांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांना मंचावरून श्रद्धांजली वाहिली. दिवंगत सीडीएस जनरल बिपिन रावत यांनी अखेरच्या श्वासापर्यंत देशासाठी अनमोल योगदान दिलेले आहे. त्यांनी देशासाठी केलेली सेवा बहुमूल्य असून ते जिथे असतील तिथून देश पुढे जाताना पाहतील, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. 8 डिसेंबर रोजी हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व शूर योद्धय़ांबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला. भारत दुःखात असला तरी ते सहन करत पुढे जाणार आहे. जनरल बिपिन रावत जेथे कुठे असतील, तेथून देशाच्या प्रगतीचे साक्षीदार होतील. सरकार आणि देशाची जनता अधिक मेहनत करून भारताला सामर्थ्यवान आणि समृद्ध करतील असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
देशाच्या सीमांची सुरक्षा वाढविण्याचे काम, सीमेवरील पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे काम, देशाच्या संरक्षण दलांना आत्मनिर्भर करण्याची मोहीम, तिन्ही संरक्षण दलांमध्ये ताळमेळ सुदृढ करण्याची मोहीम अशा अनेक कामांवर वाटचाल करत राहू. आम्ही भारतीय मिळून आणखीन मेहनत करू, देशातील आणि देशाबाहेरील प्रत्येक आव्हानाचा मुकाबला करू असे मोदी म्हणाले.
‘देशभक्त’ असलेले भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या निधनामुळे देशाचे मोठे नुकसान आहे. ते शूर होते आणि त्यांनी देशाच्या सशस्त्र दलांना स्वावलंबी बनवण्यासाठी कठोर परिश्रम केले, याचा देश साक्षीदार आहे. ‘देशभक्तां’च्या अचानक जाण्यामुळे देश दुःखात आहे, पण दुःख असूनही आपण आपली गती थांबवणार नाही. देशाची प्रगती यापुढेही सुरूच राहील, असे पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केले.
सैनिकांची शक्ती
एखादा सैनिक केवळ सैन्यात असेपर्यंत सैनिक राहत नाही, तर जीवनभर सैनिक असतो. त्याचे पूर्ण जीवन एका योद्धय़ाप्रमाणे असते. देशाच्या सुरक्षेसाठी तो सदैव समर्पित असतो. भगवद्गीतेतील ‘नैनंद छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहवित पावकः हा श्लोक सैनिकाला लागू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना
हेलिकॉप्टर अपघातातील एकमेव बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्या आरोग्यासाठी पंतप्रधान मोदींनी प्रार्थना केली. उत्तर प्रदेशचे सुपुत्र देवरिया येथे राहणारे ग्रुप कॅप्टन वरुण सिंह जी यांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टर कठोर परिश्रम करत आहेत. मी माँ पटेश्वरीकडे त्यांचे प्राण वाचवण्याची प्रार्थना करतो. देश आज वरुण सिंह यांच्या कुटुंबासोबत आहे, असेही मोदी म्हणाले.
43 वर्षांपूर्वींच्या पायाभरणीनंतर सरयू कालवा प्रकल्पाचा शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी उत्तर प्रदेशमध्ये देशातील सर्वात मोठय़ा कालवा प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. बलरामपूरमध्ये 10 हजार कोटी रुपये खर्चून बांधलेला हा सरयू कालवा प्रकल्प पूर्ण झाला आहे. सरयू कालवा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 4 दशकांहून अधिक कालावधी लागला. इंदिरा गांधींच्या कार्यकाळात 1978 मध्ये बहराईच जिह्यातून त्याचे काम सुरू झाले. त्यानंतर त्यासाठीचे बजेट 79 कोटी रुपये ठेवण्यात आले होते. 1982 मध्ये बलरामपूरसह 9 जिल्हे या प्रकल्पाशी जोडले गेले. सरकारे बदलली, पण 2017 पर्यंत केवळ 52 टक्के काम झाले. उर्वरित 48 टक्के काम योगी सरकारच्या साडेचार वर्षात पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचा फायदा पूर्वांचलमधील 9 जिल्हय़ांतील 25 लाखांहून अधिक शेतकऱयांना होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधानांसह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल देखील उपस्थित होते.
‘शूर योद्धे’ नेहमीच स्मरणात राहतील- राष्ट्रपती
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी देहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमी (आयएमए) येथे कॅडेट्सना संबोधित करताना सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे स्मरण केले. आयएमएमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या दिवंगत सीडीएस बिपिन रावत यांच्यासारखे शूर लोक नेहमीच त्यांच्या सन्मानाचे रक्षण आणि संरक्षण करतील म्हणून देशाचा ध्वज नेहमीच उंच राहील, असे कॅडेट्सना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाले. पासिंग आऊट परेडचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. याचदरम्यान राष्ट्रपतींनी प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर देशासमोर असलेल्या आव्हानांबद्दल कॅडेट्सशी संवाद साधला. देशाच्या आधुनिक काळातील धोक्मयांना सामोरे जाण्यासाठी केवळ शारीरिक आणि मानसिक कणखरपणा पुरेसा नाही. पण लष्करी नेते म्हणून, अधिकाऱयांनी धोरणात्मक मानसिकता विकसित केली पाहिजे. अनुकूल स्वभाव जोपासा आणि लष्करी नेतृत्वासाठी कौशल्ये वाढवण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक लवचिकता प्राप्त करा, असेही राष्ट्रपतींनी उपस्थित कॅडेट्स आणि अधिकाऱयांना सांगितले.