बेंगळूर / प्रतिनिधी
कर्नाटकातील काही भागांमध्ये अलीकडील अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम सलग दुसऱ्या वर्षी आंबा पिकावर होऊ शकतो. कर्नाटक आंबा महामंडळाने स्थापन केलेल्या तांत्रिक समितीने २०२२ हे वर्ष ‘ऑफ इयर’ म्हणून घोषित केले आहे.
कर्नाटक राज्य आंबा विकास आणि विपणन महामंडळ लिमिटेड (KSMDMCL) चे अध्यक्ष के.व्ही. नागराजू म्हणाले, ” आंबा पिक तज्ञांची प्रमुख चिंता म्हणजे जमिनीत ओलाव्याचे प्रमाण जास्त असणे हे आहे. अवकाळी पावसामुळे फुलांच्या सुरुवातीच्या प्रक्रियेतही अडथळा निर्माण झाला आहे. हिवाळा सुरू झाला असला तरी, अजूनही अनेक भागांत पाऊस पडत आहे, त्यामुळे फुलांच्या प्रक्रियेसाठी अनुकूल हवामान निर्माण झालेले नाही. त्यासाठी कोरडे आणि थंड हवामान आवश्यक आहे. फळांच्या हंगामात पाऊस पडल्यास, त्यामुळे माशीचा प्रादुर्भाव होईल आणि संपूर्ण पीक नष्ट होईल. त्यामुळे आम्ही या धोक्याबद्दल आणि फुलोऱ्यापूर्वी आणि नंतर फवारणीची गरज याबद्दल शेतकऱ्यांना जागरुक करत आहोत,” असे नागराजू यांनी सांगितले.