गुरुवार दिनांक 16 डिसेंबर 1971 या दिवशी बांगलादेश हा पाकिस्तानपासून विभक्त होऊन स्वतंत्र देश बनला. हा देश स्वतंत्र बनण्यामागे भारताची लष्करी मदत आणि राजकीय पाठिंबा महत्त्वपूर्ण होता. पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्यामागे वांशिक, भाषिक, सांस्कृतिक आणि राजकीय मुद्दे होते. अर्थात, हे स्वातंत्र्य काही सहज मिळाले नाही. यासाठी नऊ महिने रक्तरंजित युद्ध झाले. अपरिमित मनुष्य व वित्तहानी झाली. बांगलादेशी स्वातंत्र्य योद्धे ज्यांच्या सैन्यास मुकी वाहिनी म्हणून ओळखले जाई आणि भारतीय सैन्य यांनी संयुक्तपणे युद्ध लढले. म्हणूनच एकीकडे बांगला देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना दुसरीकडे भारतीय सेनेचा पाकिस्तानवरील विजय दिनही भारतात साजरा झाला. त्या काळात बांगलादेशाच्या स्वातंत्र्ययुद्धाने साऱया जगाचे लक्ष वेधून घेतले होते. इतकेच नव्हे तर अमेरिका, रशिया, चीन, भारत हे जागतिक महत्त्वाचे देश बांगला देशाच्या स्वातंत्र्याच्या बाजूने किंवा विरोधात या युद्धात सक्रिय झाले होते. एका परीने बांगला देश हा भाग पाकिस्तानपासून विभक्त करून, सदैव भारतविरोधी कारवायात रममाण असलेल्या पाकिस्तानला धडा शिकवित दुबळे करण्याच्या भारतीय मुत्सद्देगिरीचाही हा विजय होता. या साऱया ऐतिहासिक पार्श्वभूमीवर ज्याच्या पाठिंब्याने बांगलादेश स्वतंत्र झाला त्या भारताबरोबर आणि ज्या पाकिस्तानपासून तो स्वतंत्र झाला त्या पाकिस्तानसह बांगलादेशाचे संबंध कसे आहेत हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरते.
आरंभापासून काही अपवादात्मक प्रसंग वगळता बांगलादेशाचे भारताशी संबंध मैत्रीपूर्ण राहिलेले आहेत. भारताशी सीमारेषेचा जो दीर्घकालीन मुद्दा होता तो उभय देशांनी 2015 साली एका करारानुसार सोडवला. तरी अद्यापि उभय देशांदरम्यान ज्या नद्या वाहतात त्यांच्या पाणी वाटपासंदर्भात चर्चा, वाटाघाटींचे सत्र सुरू आहे. भारत आणि बांगलादेश एकात्मक इतिहास, समान वारसा, भाषिक आणि सांस्कृतिक संदर्भात, त्याचप्रमाणे संगीत, साहित्य आणि कला या क्षेत्रात परस्परांच्या अतिशय जवळ आहेत. बांगलादेशाचे राष्ट्रगीत ही भारतीय कवी रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले गीत आहे. तथापि, सत्तरच्या दशकाच्या मध्यावर बांगलादेशाचे इस्लामी देशांशी निकट संबंध प्रस्थापित झाले. बांगलादेशाने इस्लामी संघटना परिषदेतही सहभाग दर्शवला. त्याचबरोबर भारताशी नाते सांगणारे वांशिक-भाषिक अस्तित्व बाजूस सारुन इस्लामधर्मीय अस्तित्वावर अधिक भर दिला. रशिया-अमेरिका शीत युद्धाच्या दरम्यान दोन्ही देश परस्पर विरोधी गोटात गेले आणि तणावात वाढ झाली. तथापि, या शीतयुद्धाचा अंत होऊन जागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्यावर उभय देशातील व्यापारी संबंध झपाटय़ाने वाढले. गंगा नदीच्या पाणी वाटपाचा दीर्घकालीन प्रश्नही 1996 साली सोडविण्यात आला. त्याचप्रमाणे गेल्या तीन दशकात वाढलेल्या दहशतवादाच्या प्रश्नावर दोन्ही देश एकत्र येत राहिले. 2012 नंतर नैसर्गिक वायूची वाहतूक, भारताकडून वीजपुरवठा, विशेष आर्थिक क्षेत्र निर्मिती, भारताकडून कर्ज, विविध क्षेत्रात उभय देशांची परस्पर संमतीने गुंतवणूक, एप्रिल 2017 साली झालेले संरक्षण विषयक आणि लष्करी सहकार्याचे करार यामुळे उभय देशांचे संबंध अधिक जवळ येत गेले. भारताची बांगलादेशास होणारी प्रामुख्याने कृषी मालाची आणि इतर वस्तूंची निर्यात अलीकडच्या काळात इतक्मया लक्षणीयरित्या वाढली की, भारताचा, बांगलादेश हा चौथ्या क्रमांकाचा निर्यात भागीदार ठरला आहे. बांगलादेशाशी होणारी भारताची निर्यात ही रेल्वे आणि जलमार्गाने प्रामुख्याने होत असल्याने दोन्ही देशांसाठी ती किफायतशीर ठरते आहे. दोन्ही देशातील संबंधांना अशा प्रकारे व्यापार आणि आर्थिक सहकार्याचा हातभार लागत असल्याने मैत्रीचा पाया अधिक भक्कम होण्यास अधिकच अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील स्फोटक परिस्थिती हा दोन्ही देशांच्या दृष्टीने सारख्याच चिंतेचा विषय आहे. अशा स्थितीत अंतर्गत व सीमेनजीकची सुरक्षा व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी परस्पर विश्वास आणि सहकार्याची दोन्ही देशांना नितांत गरज आहे. बांगलादेशी नागरिकांचा अनधिकृत भारत प्रवेश, त्यांच्या सीमा सुरक्षा दलाशी चकमकी, बांगलादेशातील काही मूलतत्त्ववादी संघटनांचा हिंदू आणि इतर अल्पसंख्याक जमाती विषयक विद्वेष व हिंसाचार हे प्रश्न अलीकडच्या काळात वाढताना दिसत आहेत. या विषयांवरही त्यांची संवेदनशीलता व उपद्रवक्षमता जाणून दोन्ही देशांनी वाटाघाटींनी मार्ग काढण्याची आज गरज आहे.
भारताच्या तुलनेत पाकिस्तानशी बांगलादेशाचे संबंध तुलनात्मकरित्या तणावपूर्ण राहिले आहेत. याआधी लिहिलेल्या पार्श्वभूमीवर असे होणे स्वाभाविक आहे. 2013 साली जमाते-ए-इस्लामीचे नेते अब्दुल कादर मुल्ला यांना बांगलादेश युद्ध गुन्हेगार म्हणून फासावर लटकवण्यात आले. हा नेता पाकिस्तान व बांगलादेश स्वातंत्र्याच्या विरोधात होता. दोन्ही देशांच्या युद्धादरम्यान त्यांनी बांगला नागरिकांच्या ज्या कत्तली केल्या त्यामुळे त्याला ‘मीरपूरचा खाटीक’ म्हणून ओळखले जायचे. सहाजिकच बांगलादेश सरकारने त्याला आणि काही युद्ध गुन्हेगारांना देहदंड दिल्याने त्याच्या तीव्र प्रतिक्रिया पाकिस्तानातून उमटल्या. राजकीय तणावही निर्माण झाला. 2015 आणि 2016 च्या दरम्यान दोन वेगवेगळय़ा घटनात ढाक्मयातील पाकिस्तानी दूतावासातून बांगलादेशाने बंदी घातलेल्या जमाते-उलöमुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेस आर्थिक मदत, तीही दहशतवादी कारवायांसाठी मिळाल्याचे स्पष्ट झाले. यावर बांगलादेशाने कारवाई केली आणि पाक-बांगलादेश तणाव वाढला. एकंदरीतच पाकिस्तानमधील लष्कर व आयएसआय गुप्तचर संघटनेचे सत्ताधाऱयांवरील वर्चस्व, तेथील दहशतवादी संघटनांचे अस्तित्व आणि त्याला असलेला जागतिक पातळीवरील विरोध यामुळे बांगलादेशास इतक्मया वर्षांनंतरही पाकिस्तान हा विश्वासार्ह देश वाटत नाही. विश्वासार्हतेच्या अभावामुळे दोन्ही देशातील व्यापार विषयक, सांस्कृतिक आणि सुरक्षाविषयक संबंध यथातथाच आहेत. तथापि, पाकिस्तानापासून विभक्त झाल्यानंतर बांगलादेशाने पाकिस्तानच्या तुलनेत जो विकास साधला आहे तो पाकिस्तानला आत्मपरिक्षण करावयास लावणारा आहे. बांगलादेशात साक्षरता 75 टक्के आहे तर पाकिस्तान 58 टक्क्यांवर आहे. सुरक्षा, रहिवास पर्यटन या संदर्भात मूलतत्त्ववाद आणि दहशतवादामुळे पाकिस्तान हा असुरक्षित देश मानला जातो. दुसरीकडे कुठल्याही प्रकारचा कट्टरतावाद व दहशतवाद या विरोधात कठोर भूमिका घेणारा देश ही बांगला देशाची ओळख बनली आहे. गेल्या पन्नास वर्षात पाकिस्तानचा सरासरी सकल राष्ट्रीय उत्पन्न 6 टक्क्मयांनी बांगलादेशापेक्षा खाली आहे. बांगलादेशाचे दरडोई उत्पन्नही पाकच्या दुप्पट आहे. निर्यात, उद्योग, सामाजिक विकास, वित्तीय उलाढाल या साऱयाच पातळय़ांवर अधिकृत आकडेवारीनुसार बांगलादेश हा पाकिस्तानपेक्षा सरस स्थिती दर्शवतो. यासाठीच स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असताना हे स्वातंत्र्य सत्कारणी लागले याचा आनंद बांगलादेशीय नागरिकांना जरूर होत असावा.
अनिल आजगावकर