सोमवारी शिरोळमध्ये होणार बैठक, पश्चिम महाराष्ट्रातील गाडीवानांना मिळणार सभासदत्व
कोल्हापूर / संग्राम काटकर
राज्यात बंदी घातलेल्या बैलगाडी शर्यत आयोजनास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्र छत्रपती शाहू महाराज बैलगाडी रेसिंग असोसिएशनची पुनर्स्थापना करण्याचा विचार पुढे आला आहे. त्यासाठी गेल्या चार-पाच दशकांपासून बैलगाडी शर्यतीत भाग घेणाऱया ज्येष्ठ गाडीवानांनी (स्पर्धक) हालचालींना सुरुवात केली आहे. त्यांनी सोमवारी 20 रोजी शिरोळमधील बाळासाहेब शेख यांच्या घरी बैठक बोलावून त्यात असोसिएशनची पुनर्स्थापना करण्याचे ठरवले आहे. असोसिएशनच्या स्थापनेमुळे पश्चिम महाराष्ट्रात होणाऱया बैलगाडी शर्यती शासन नियमांना धरुन होतात की नाही, शिवाय शर्यतीमध्ये बैलांना केल्या जाणाऱया मारहाणीवर नजर राहणार आहे.
महाराष्ट्रात होत असलेल्या जत्रा-यात्रांमधील प्रमुख आकर्षण म्हणजे बैलगाडी शर्यत. या शर्यतींमधील शेकडो बैलांनी वेगवान धाव घेऊन नंबर काढत गाडीवानांना लाखो रुपयांची बक्षीसे मिळवून दिली हे सर्वज्ञात आहे. गाडीवानांनीही ही बक्षीसे मिळवून देणाऱया लाडक्या बैलांना शाब्बासकी म्हणून त्यांच्या काढलेल्या मिरवणुका महाराष्ट्राने पाहिल्या आहेत.
1980 च्या काळात शर्यतीला वाहनांमधून बैलं घेऊन जाणाऱया बऱयाच गाडीवानांना नाहक त्रासांना समोरे जावे लागले. शिवाय त्यांच्यासमोर काही अडचणींही निर्माण झाल्या. यातून सुटका करुन घेण्यासाठी 1982 साली पश्चिम महाराष्ट्र छत्रपती शाहू महाराज बैलगाडी रेसिंग असोसिएशनची स्थापना केली. त्यासाठी नागदेववाडीचे शंकरराव ढेरे, जयसिंगपूरचे सूर्याजी खाडे, दादाभाई जमादार (डिग्रज) यांचा विशेष पुढाकार होता. कालांतराने असोसिएशनशी 250 गाडीवान जोडले गेले. मात्र काही कारणांनी 1986 साली असोसिएशन बंद पडले. शिवाय मधल्या काळात बैलगाडी शर्यतीसाठी नेटाने पुढाकार घेणारे असोसिएशनच्या काही माजी सदस्यांचे निधनही झाले. त्यामुळे असोसिएशन पुन्हा सुरु करण्यासाठी कोण पुढाकार घेणार, अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.
गेल्या गुरुवारी बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवल्याची गोड वार्ता गाडीवानांपर्यंत येऊन धडकली आणि त्यांना बंद पडलेल्या असोसिएशनची पुनर्स्थापना करण्याची कुणकुण लागली. कोल्हापुरातील सर्जेराव ऊर्फ गोगा पाटील यांच्यासह बाबुराव मोहिते (बागल चौक), विजय बेडेकर (रा. कसबा बावडा), नारायण गाडगीळ, दाजी पाटील (दोघे रा. पाचगाव), धनपाल पोमाजी, धोंडीराम गाडगीळ, सर्जेराव शिंदे या ज्येष्ठ गाडीवानांनी पुढाकार घेऊन असोसिएशनचे स्थापन करण्याचे पक्के केले. त्यानुसार येत्या सोमवारी 20 रोजी शिरोळमधील बाळासाहेब शेख यांच्या घरी बैठक बोलावली आहे. या बैठकीत असोसिएशनच्या कशा पद्धतीने कार्यरत राहील याची रुपरेषाही ठरवली जाणार आहे.
बैलगाडी शर्यतीत वाहनांना बंदी करणार…
बैलगाडी शर्यतीत वाहनांना प्रवेश बंद करण्यावर सोमवारच्या बैठकीत चर्चा केली जाईल. कारण काही लोक चांगल्या बैलगाडीला स्पर्धा जिंकता येऊ नये यासाठी बैलांच्या आडवी दुचाकी नेण्याचा संतापजनक प्रकार करत असतात. शिवाय स्पर्धा संपल्यानंतर बैलांच्या आडवे मुद्दाम वाहन आणल्याच्या कारणावरुन वादावादीही होत असते. हा प्रकार कामयचा थांबण्यासाठी असोसिएशन पुढाकार घेईल. – सर्जेराव ऊर्फ गोगा पाटील (महाराष्ट्रातील नामवंत बैलगाडी शर्यत स्पर्धक)
असोसिएशनने अंकुश ठेवण्याचे काम करावे…
बैलगाडी शर्यतीला परवानगी देताना काही नियम अटी न्यायालयाने घातल्या आहेत. या अटींचा भंग होणार नाही याची दक्षता स्पर्धा आयोजक व गाडीवानांना घ्यावीच लागेल. तसेच आयोजकांनी स्पर्धा आयोजनापूर्वी असोसिएशन व प्रशासनाची परवानगी घेण्याला प्राधान्य द्यावे. नियम-अटींचा भंग झाल्यास स्पर्धा आयोजनावर बंदी येईल, याची जाणिव सर्वांना पदोपदी ठेवावी लागेल. असोसिएशननेही स्पर्धा व गाडीवानांवर अंकुश ठेवण्याचे कामही करावे. – सुरेश सरनाईक (रा. शिवाजी पेठ)