महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळसह देशभर ख्रिसमसचा सण मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येत असून, थर्टी फर्स्ट व नववर्षाच्या स्वागतासाठीही अवघा देश सज्ज झाला आहे. सरत्याला निरोप आणि नव्या वर्षांत प्रवेश हा सर्वच नागरिकांसाठी आनंदाचाच क्षण असतो. या आनंदाचा साक्षीदार होण्याकरिता प्रत्येक जण निश्चितपणे उत्सुक असेल. मुळात बदल हा मानवी जीवनाचा स्थायीभाव आहे, तर नवतेचा ध्यास हे मानवी स्वभावाचे वैशिष्टय़. त्यामुळे नव्या वर्षाला सामोरे जात असताना प्रत्येक जण आपापल्या परीने नवे संकल्प करतो वा ते सिद्धीस नेण्यासाठीची पायाभरणीही करत असतो. भारतासह साऱया जगाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास 2020 आणि 2021 ही दोन्ही वर्षे कोरोनाच्या प्रभावाखाली गेली. या दोन वर्षांत अनेकांनी आपले आप्तस्वकीय वा लाखमोलाची माणसे गमावली. रोजगाराच्या प्रश्नासह आर्थिक व मानसिक ताण यात जनमानसाची मोठय़ा प्रमाणावर कोंडी झाली. साहजिकच 2022 मध्ये हे मळभ दूर होऊन पुन्हा एकदा मुक्त जीवन जगण्याची अपेक्षा प्रत्येकाच्याच मनात नांदत असणार. अर्थात सध्याची स्थिती पाहता पुढचे काही दिवस वा महिने तरी नियमांच्या व निर्बंधांच्या चौकटीतच आपल्याला जगावे लागेल, असे दिसते. मागच्या काही दिवसांपासून कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटने जगभर हात पसरायला सुरुवात केली असून, जवळपास 110 देशांमध्ये त्याचा प्रसार झालेला पहायला मिळतो. भारतातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 350 वर पोहोचली असून, त्यात शंभराहून अधिक रुग्ण हे एकटय़ा महाराष्ट्रातील आहेत. हे पाहता महाराष्ट्राला अधिकची काळजी घ्यावी लागेल. ओमिक्रॉनच्या प्रसाराचा वेग हा डेल्टापेक्षा कितीतरी अधिक असला, तरी हा विषाणू तितकासा घातक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीदेखील गाफील न राहता ओमिक्रॉन नियंत्रणात ठेवण्याकरिता आवश्यक दक्षता घेणे क्रमप्राप्त ठरते. ओमिक्रॉनला अटकाव करण्याकरिता राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाना, उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांनी नाईट कर्फ्यू घोषित केला असून, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडूसह विविध राज्यांमध्येही कडक निर्बंध लावलेले दिसतात. या निर्बंधांचे पालन करणे, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी ठरते. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्रात रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळेत जमावबंदी लागू करण्यात आली असून, हॉटेल, उपहारगृहे, चित्रपटगृहे, विवाह तसेच सार्वजनिक आणि खासगी समारंभांवर संख्येचे निर्बंध असतील. ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्याकरिता हे सारे आवश्यकच. परंतु, केवळ एवढय़ाने भागणार नाही. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग, स्वच्छता राखणे या त्रिसूत्रीवर पुन्हा भर द्यावा लागेल. आजही रुग्णसंख्या वाढत असताना अनेक नागरिक मास्कविना मुक्तपणे फिरताना पहायला मिळतात. रस्त्यावर पिचकाऱया मारणाऱया वा थुंकणाऱयांचेही उदंड पीक दिसून येते. त्यामुळे शासनाने आधी मास्कबाबत पूर्वीप्रमाणे कडक भूमिका घ्यायला हवी. मास्क अनिवार्य, मास्कशिवाय प्रवेश नाही, अशा स्वरुपाचे केवळ फलक लावून उपयोग होणार नाही. तर मास्कची कडक अंमलबजावणी करतानाच संबंधितांकडून दंड वसूल केल्याशिवाय त्यांच्या वागण्यात बदल होणे कठीण आहे. नागरिक म्हणून आपल्याही काही जबाबदाऱया, कर्तव्ये आहेत. याचे भान ज्याने त्यानेदेखील ठेवायला हवे. खरे तर मास्क स्वतःच्या आणि इतरांच्या अशा दोघांच्याही संरक्षणाच्या दृष्टीने सर्वोत्तम पर्याय होय. या संरक्षक कवचामुळेच आत्तापर्यंत कोरोनापासून कितीतरी नागरिक सुरक्षित राहिले. हे ध्यानात घेऊन तरी नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे. याशिवाय वातावरण पुन्हा सुरळीत होईपर्यंत गर्दी टाळणेही प्रत्येकासाठी हितावह. आगामी काळात उत्तर प्रदेश, पंजाब, गोव्यासह पाच राज्यांमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. यूपी हे देशातील सर्वांत मोठे राज्य असून, तेथे प्रचाराला आलेला वेग, उसळलेली गर्दी धडकी भरविणारीच म्हटली पाहिजे. स्वाभाविकच त्याबद्दल अलाहाबाद उच्च न्यायालयानेही चिंता व्यक्त केली असून, निवडणूक पुढे ढकलता येईल का, अशी विचारणा निवडणूक आयोगास केली आहे. तर प्रचारसभांवर बंदी घालण्याचा सल्लाही नेतृत्वास दिला आहे. आता यावर आयोग काय निर्णय घेणार, हे पहावे लागेल. आजमितीला देशभरात 83.29 कोटी लोकांनी म्हणजे 79 टक्के नागरिकांनी कोरोनावरील लशीचा पहिला डोस घेतला आहे. तर 57.2 कोटी म्हणजेच 61 टक्के नागरिकांनी दोन्ही लशी घेतल्या आहेत. याचा अर्थ अजूनही 39 टक्के लोकांची लसीकरण पूर्ण झालेले नाही. हे उद्दिष्ट कधी गाठले जाणार, हे स्पष्ट नाही. तरी या आघाडीवर जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. केंद्र सरकारकडून बूस्टर डोसचीही चाचपणी केली जात असून, याबाबतचा अभ्यास व पडताळणी सुरू आहे. त्याचे निष्कर्ष जितक्या लवकर येतील, तितके बरे होईल. कोरोनाच्या तिसऱया लाटेचा संसर्ग फेब्रुवारीत उच्चांकी पातळीवर पोहोचू शकतो, असा अंदाज आयआयटी कानपूरमधील संशोधकांनी व्यक्त केला आहे. हे बघता आवश्यक आरोग्य सुविधांच्या बाबतीत आपल्याला सज्जता ठेवावी लागेल. उसळणारी प्रत्येक लाट ओसरणे, हा निसर्ग नियमच आहे. कोरोनाच्या दोन्ही महाभयंकर लाटांशी दोन हात केल्यानंतर ओमिक्रॉनचे आव्हान आपल्यासाठी नक्कीच मोठे नसावे. अनेक रुग्णांमध्ये याची अगदी सौम्य स्वरुपाची लक्षणे आढळली असून, फार मोठय़ा उपचारांअभावी ते ओमिक्रॉनमुक्त झाल्याचेही पहायला मिळते. अर्थात पुढच्या टप्प्यात योग्य रणनीती हवी. अटकाव आणि उपचार या दोन्ही स्तरांवर राज्यांनी बारीक नियोजन करावे. आता लॉकडाउन वा कडक निर्बंध हा पर्याय सोयीचा नाही. प्रत्येकाने काटेकोरपणे नियम पाळले, तर ओमिक्रॉन व लॉकडाऊन अशा दोन्ही गोष्टींपासून दूर राहता येईल. नव्या वर्षात प्रवेश करताना हे भान ठेवावे लागणार.
Previous Articleमिरज मेडीकल’च्या सात विद्यार्थिनींना कोरोना
Next Article पाकिस्तानात 2 हिंदू मुलींचे बळजबरीने धर्मांतर
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.