अध्याय तेरावा
भगवंतांनी उद्धवाला सत्व, रज आणि तमोगुणांच्या व्यक्तींची वैशिष्टय़े सांगितली. पुढे ते तिहीचेही सर्वसाधारण स्वरूप सांगत आहेत. ते म्हणाले, श्रे÷ लोक ज्यांची प्रशंसा करतात, ते सात्त्विक समजावेत, ज्यांची उपेक्षा करतात ते राजस आणि ज्यांची निंदा करतात, ते तामस समजावेत. याबद्दल सविस्तर विवेचन मी करीन म्हणजे तुला सत्वगुणाचे महात्म्य व सत्ववृद्धीची आवश्यकता का असते हे नीट समजेल व त्याप्रमाणे जे आचरण करतील त्यांचा उध्दार होईल.
आपल्या वाडवडिलांची बुद्धि विचाराने परिपक्व झालेली असते त्यांचे आचरण सात्त्विक असते, असे माझे ठाम मत आहे. विचारवंतांच्या उपदेशाप्रमाणे ज्या गोष्टींची लोक निंदा करतात, ती ती तमोगुणाची पीडा होय. ज्याची कोणी स्तुतीही करीत नाही, कोणी निंदाही करीत नाही, मनापासून उपेक्षा मात्र करतात, ते कृत्य खरोखर राजस होय. त्याची बाधा फार कठीण ! ज्याप्रमाणे विष घालून शिजविलेले अन्न वरून वरून गोड लागते, परंतु त्याच्या आत मरण असते, त्याप्रमाणे हा राजस गुण आहे असे समज. त्याचे बंधन मोठे विलक्षण असते. राजसाला ज्ञानोपदेश करता करता वेदसुद्धा टेकीस आला. त्याला उपदेश करताना ब्रह्मदेवसुद्धा थकला. खुद्द माझ्यानेसुद्धा त्याला उपदेश करवत नाही. म्हणून विचारी लोकांनी रजोगुण उपेक्षा करून फेकून दिला आहे.
म्हणून साधकांनी सात्त्विकाचेच सदासर्वदा अवश्य सेवन करीत असावे. त्या सात्त्विकसेवनाचा संपूर्ण गुण तुला मी आता सांगतो ते ऐक. माणसाने सत्त्वगुणाच्या वृद्धीसाठी सात्त्विक पदार्थांचेच सेवन करावे. त्यामुळे धर्म वाढून ज्ञान उत्पन्न होईल आणि ज्ञानामुळे आत्मसाक्षात्कार होऊन सर्व प्रकारचे संशय नाहीसे होतील. सात्त्विक पदार्थांचे सेवन केले असता सत्वगुणाची वृद्धि होते आणि सत्त्वगुणाची वृद्धि झाली असता धर्माचरणाकडे आपोआपच प्रवृत्ती होते. धर्मप्रवृत्तीने माझे भजन घडते आणि माझ्या भक्तीचा उल्हास वाढला की भक्तांना मी प्रसन्न होतो, त्यावेळी आत्मज्ञानही आपोआप प्रगट होते असे समज. हे ऐकून उद्धवाच्या मनात आले की, ‘तत्त्वमसि’ इत्यादि जी वाक्मये आहेत, त्यांचा अर्थ गुरूच्या द्वाराने कळून ज्ञानप्राप्ती होते, तर मग सत्त्वशुद्धीने कोणत्या हेतूकरिता धर्मभक्ति केली पाहिजे? मनकवडय़ा भगवंतांनी उद्धवाच्या मनातला प्रश्न जाणला आणि उत्तरादाखल म्हणाले, उद्धवा! सत्त्वशुद्धि झाल्याशिवाय, केवळ गुरुवाक्मयाचे श्रवण घडले, तर ते बाजारातल्या कलकलाटाप्रमाणे होय. त्याने कधी आत्मस्वरूपाची ओळख व्हावयाची नाही. आंधळे पोर रात्रंदिवस स्तनपान करीत असते. पण त्याला आई कधीही दृष्टीस पडत नाही. तशीच त्या उपदेशाची स्थिति असते. प्रत्येक इंद्रियांत सजीवपणा ठेवून भगवान् हा सर्वांचाच प्रतिपाळ करीत असतो. परंतु विषयाने आंधळी झालेली माणसे त्याला पहात नाहीत. कारण त्यांच्या चित्ताची शुद्धीच झालेली नसल्यामुळे त्यांना काहीच दिसत नाही. शेळीच्या गळय़ात चामडे लोंबत असते, त्याला ‘स्तन’ असे म्हणतात पण त्यातून दूध मिळत नाही त्याचप्रमाणे सत्वाची बुद्धि झाल्याशिवाय उपदेश व्यर्थ होय. वाहत्या पाण्यावर अक्षरे लिहिली तर त्या पाण्याच्या पृ÷भागावर एक अक्षरसुद्धा उमटत नाही. त्याप्रमाणे आत्मज्ञानही सत्त्वशुद्धीशिवाय स्पष्टपणे प्रगट होत नाही. पूर्णपणे सत्त्वशुद्धि झाली असताही जोपर्यंत धर्मबुद्धि प्रगट होत नाही, तोपर्यंत, ग्रहणात ज्याप्रमाणे चंद्र दिसत नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञानाचीही सिद्धि व्हावयाची नाही.
हरिकथाश्रवण करू लागले की, कंठ भरून येईल, अंगावर रोमांच उभे राहतील, अंगाला घाम येईल, रडूं येईल पण एक पै खर्चण्याचा वेळ आली की, प्राण कंठाशी येतील असे ज्याचे वर्तन असेल त्याच्या ठिकाणीही ब्रह्मज्ञान प्रगट व्हावयाचे नाही. अंतःकरणातील लोभ जोपर्यंत सुटला नाही, तोपर्यंत खरे ज्ञान कसे मिळणार? जेव्हा सत्त्वशुद्धि आणि धर्म ही दोन्ही स्पष्ट दिसू लागतील, तेव्हाच तो आत्मज्ञानाच्या जोरदार प्रेरणेने योग्य मार्गाला लागतो.
क्रमशः