विकेंड कर्फ्यूची नागरिकांना धास्ती : शनिवारच्या आठवडी बाजारावर होतोय परिणाम
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने विकेंड कर्फ्यू जारी केला आहे. त्यामुळे बाजारपेठेत विविध साहित्यांच्या खरेदीसाठी शुक्रवारी गर्दी झालेली पहायला मिळाली. प्रशासनाने जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी विकेंड कर्फ्यू काळात मुभा दिली असली तरी मागील आठवडय़ापासून नागरिक विकेंड कर्फ्यूच्या धास्तीने शुक्रवारी बाजारपेठेत गर्दी करत आहेत.
शहरातील काकतीवेस रोड, शनिवार खूट, समादेवी गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, पांगुळ गल्ली, रामदेव गल्ली, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली यासह रविवारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती. शनिवार, रविवार बाजारपेठ बंद राहणार या हेतूने शुक्रवारी बाजारपेठेत लहान किराणा दुकानदार, गृहिणी व इतर नागरिकांची वर्दळ वाढली होती. मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवारपेठमध्ये पादचाऱयांबरोबर अवजड वाहनांची संख्या वाढली होती. शिवाय वाहनांतील माल उतरण्यासाठी आणि भरण्यासाठी हमालांची देखील लगबग दिसून आली.
कोरोनाला थोपविण्यासाठी शासनाने विविध निर्बंध घातले असले तरी बाजारपेठेत होणारी गर्दी चिंताजनक आहे. बाजारात खरेदीसाठी येणारे सर्रास नागरिक मास्क न लावता फिरत आहेत. शिवाय विपेतेदेखील मास्ककडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. तसेच खरेदीसाठी गर्दी होत असल्याने कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे.
विकेंड कर्फ्यूमुळे शनिवार, रविवारच्या खरेदीची गर्दी शुक्रवारीच दिसून येत आहे. विकेंड कर्फ्यूकाळात काही मिळणार नाही, या धास्तीने नागरिक शुक्रवारीच बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी करीत आहेत.
शनिवारची उलाढाल थांबली
शनिवारच्या आठवडी बाजारात दैनंदिन बाजाराबरोबरच कोंबडय़ा, शेळय़ा-मेंढय़ा व इतर साहित्यांची मोठी खरेदी विक्री होते. त्यामुळे शनिवारच्या बाजारात मोठी उलाढाल होते. मात्र विकेंड कर्फ्यूमुळे शनिवारच्या बाजारावर परिणाम झाला असून उलाढाल थांबली आहे.