जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
समाजातील ज्येष्ट, उपेक्षित, निराधार वृद्धांची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिले. ज्येष्ट नागरिक संघटनेच्या तक्रार निवारण बैठकीमध्ये त्यांनी हे आश्वासन दिले आहे.
वृद्ध झाल्यानंतर मुले दुर्लक्ष करत असतात. बऱयाच जणांची हकालपट्टीही ही मुले करत असतात. त्यामुळे वृद्ध लोक बेवारस होतात. मात्र आता कायद्यानेच ज्येष्ठाना विविध अधिकार दिले आहेत. त्या अधिकाराच्या माध्यमातून मुलांकडील मालमत्ता वृद्धांना हस्तांतरित करण्याचा अधिकार आम्हाला आहे. तेंव्हा तक्रार करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनदेखील जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले आहे.
सरकारी कार्यालये, रुग्णालये तसेच बँका व इतर कार्यालयांमध्ये ज्येष्ट नागरिक आल्यानंतर प्रथम त्यांच्या कामांना प्राधान्य द्या. त्यांच्यासाठी विशेष सेवा काऊंटर देखील सुरू करा, अशी सूचनादेखील जिल्हाधिकाऱयांनी अधिकाऱयांना दिली आहे. बँकांमध्ये आठवडय़ातून एक दिवस ज्येष्ठासाठी स्वतंत्र सेवा काऊंटर सुरू करण्याबाबतही त्यांनी अधिकाऱयांना सांगितले.
कोणत्याही योजना असू दे, निवृत्ती वेतन असू दे, थेट वृद्धांच्या बँक खात्यावर जमा करण्याबाबत प्राधान्य द्या, असे त्यांनी सांगितले. ज्येष्ठाची हेळसांड होवू नये यासाठी सर्व अधिकाऱयांनी, डॉक्टरांनी काळजीने काम करावे, असे यावेळी सांगण्यात आले.
आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करा
ज्येष्ट नागरिकांना उपचार देण्यासाठी जिल्हा, तालुका पातळीवरील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये विशेष कक्ष स्थापन करा. त्यांना वेळेत सेवा द्या, असे ते म्हणाले. बसमधून प्रवास करताना त्यांच्या ओळखपत्राची पडताळणी करून तिकिटामध्ये असलेली सवलत तातडीने द्या, असे सांगण्यात आले. सध्या ज्येष्ट नागरिकांना निवारा देण्यासाठी तसेच अत्याचार झाल्यानंतर मदत करण्यासाठी 14567 ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ज्येष्ठाच्या तक्रारीची दखल प्रत्येकाने घेतली पाहिजे, त्यांना वेळेत सर्व सुविधा, सवलती पुरविल्या पाहिजे, असे त्यांनी सांगितले. या बैठकीला विविध अधिकारी आणि ज्येष्ट नागरिक उपस्थित होते.