प्रतिनिधी/ बेळगाव
सह्याद्रीनगर येथील विवाहितेने आपल्या दोन मुलांसह अरगन तलावात उडी टाकून आत्महत्या केल्याच्या घटनेला शनिवारी कलाटणी मिळाली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून तिने आपले जीवन संपविल्याची फिर्याद माहेरवासियांनी दिली आहे. पतीसह पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपी फरारी आहेत.
दरम्यान शनिवारी दुपारी तिसरा मृतदेहही पाण्याबाहेर काढण्यात यश आले. क्रिशा मनीष केशवाणी (वय 36) या विवाहितेने मुलगा भाविर (वय 4), विरेन (वय 7) या दोघा जणांसह अरगन तलावात उडी टाकून आपले जीवन संपविले होते. शुक्रवारी ही घटना घडली होती. शुक्रवारी सायंकाळपर्यंत क्रिशा व भाविरचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला होता.
अंधारामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली होती. अग्निशमन दलाचे जवान व एसडीआरएफ बरोबरच बसवराज हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली एचईआरएफ रेस्क्मयु टीममधील कार्यकर्त्यांनीही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यास मदत केली. कॅमेऱयाच्या मदतीने मृतदेहाचा शोध लावण्यात आला. पद्मनंदन हुली व पंकज हंडे, राहुल पाटील, राजू टक्केकर आदींनी या मोहिमेत भाग घेतला.
शनिवारी तीनही मृतदेहांवर सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. क्रिशाची आई रिटा कन्हय्यालाल अहुजा (रा. स्टेशन रोड, मिरज) यांनी पाच जणांविरुद्ध फिर्याद दिली असून भा.दं.वि. 498(ए), 306 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी पुढील तपास करीत आहेत.
क्रिशाचा पती मनीष रामचंद्र केशवाणी, सासू नीना रामचंद्र केशवाणी, ननंद आरती रामचंद्र केशवाणी, पूजा कराडे (सर्व रा. बेळगाव) व विक्की चट्टाणी (रा. उत्तर गोवा) या पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विक्की हा क्रिशाचा भावोजी असून तिच्या सासरच्या मंडळींबरोबर मिळून त्यानेही तिला त्रास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मिरजहून आलेल्या क्रिशाच्या माहेरवासियांनी पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध सुरूवातीला खुनाचा आरोप केला. क्रिशाने आत्महत्या केली नाही तर तिचा खून करण्याचा आरोप करण्यात आला. शेवटी सासरच्या जाचाला कंटाळून तिने आपल्या दोन मुलांसह जीवन संपविल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागाराबाहेर गर्दी जमली होती.
आरोपी फरारी
पतीसह सासरच्या मंडळीला अटक करावी, अशी मागणी माहेरवासियांनी केली. मात्र पती मनीष केशवाणी हा शुक्रवारी रात्रीपासून फरारी झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला का जाऊ दिले? सुरुवातीलाच त्याला का अटक करण्यात आली नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. पत्नी, एका मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. आणखी एका मुलाचा शोध सुरू आहे. त्यामुळे मनीष कोठे जाणार नाही, ही पोलिसांची समजूत होती. मात्र तो फरारी झाल्याचे सांगण्यात आले. तो गोव्यात असल्याची माहिती मिळाली असून पोलीस त्याला अटक करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.