गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची ट्वीटरद्वारे माहिती, नोकरदारांची होणार सोय
प्रतिनिधी/मिरज
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 22 महिन्यांपासून सांगली-कोल्हापूर ही पॅसेंजर रेल्वे सेवा बंद आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग घटत असल्याने रेल्वे विभागातील प्रमुखांशी चर्चा करुन कोल्हापूर-सांगली मार्गावर पॅसेंजर रेल्वे लवकरात लवकर सुरू केली जाईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूर जिह्याचे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्र रेल प्रवासी ग्रुपने दिलेल्या निवेदनावर मंत्री पाटील यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे. कोल्हापूर-सांगली पॅसेंजर रेल्वे सुरू होत असल्याने दैनंदिन प्रवास करणाऱ्या नोकरदारांची तसेच सामान्य प्रवाशांची सोय होणार आहे.