वाढीव बिलांमुळे दवर्लीवासीय संतप्त,सुधारणा न केल्यास मोर्चाचा इशारा
प्रतिनिधी /मडगाव
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाने एकाचवेळी 6 महिन्यांची बिले पाठवून दिलेली असून आठ ते दहापट अशी वाढीव बिले आली आहे आहेत, असा दावा करताना या बिलांचे दर बरोबर करून देण्याची मागणी संतप्त झालेल्या दवर्लीवासियांनी केली आहे. अन्यथा खात्यावर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
रविवारी दवर्लीतील विविध प्रभागांतील रहिवाशांनी येथील मैदानाजवळ गोळा होऊन या वाढीव पाणीबिलांचा निषेध केला. दर महिन्याला बिले येत असताना प्रत्येकाच्या पाण्याच्या वापरानुसार पाचशेच्या आंत वा फार तर हजाराच्या आंत बिले येत होती. सहा महिन्यांनी बिले येण्याबरोबर 5 हजारांपासून 11 हजार रुपयांपर्यंतची वाढीव बिले दवर्लीवासियांना आली असल्याची माहिती येथील रहिवासी आनंद सावंत यांनी दिली.
चूक सुधारून नव्याने बिले पाठवा
सहा महिन्यांनी बिले आल्याने युनिटमध्ये वाढ झाली व 150 च्या वर युनिट गेल्यानंतर पुढे वाढीव दराने बिले तयार करून ती दवर्लीवासियांना पाठविली गेली आहेत, असा दावा यावेळी करण्यात आला. दर महिन्याची वेगळी बिले तयार करून पाणीपुरवठा खात्याने आपली चूक सुधारून बिले पाठवावीत, अशी मागणी उपस्थितांनी उचलून धरली.
वाढीव बिले आमच्या माथी का ?
पाणीपुरवठा खाते मनुष्यबळ नसल्याने दर महिन्यात बिले पाठविणे शक्मय होत नसल्याचे सांगत आहे. मात्र कर्मचारी नाहीत म्हणून वाढीव बिले आमच्या माथ्यावर का मारता. खात्याने आमच्या बेरोजगार मुलांना काम देऊन दर महिन्याला बिले पाठवावीत, अशी सूचना एका महिलेने केली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पाण्याची बिले कमी होऊन येणार असे सांगितले होते. मात्र आता उलटेच प्रकार पाहावयास मिळत आहेत. पाणीपुरवठा खात्याने त्वरित पावले उचलताना आम्हाला प्रत्येक महिन्याची बिले तयार करून पाठवावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा मोर्चा नेण्यावाचून पर्याय राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.